प्राथमिक टप्प्यातील अनेक ठिकाणी वायफायमध्ये दोष
आगामी महानगरपालिकेच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने मुंबई ‘वायफायमय’ करण्याची योजना आखली असली तरी ‘वायफाय’ जोडताना येणाऱ्या अडचणी, विलंब यामुळे मुंबईकरांचे सतत ‘वायफाय कनेक्ट’ राहण्याचे स्वप्न अद्याप फलद्रूप झालेले नाही.
मुंबईत प्राथमिक टप्प्यात लावण्यात आलेल्या केंद्रांच्या ठिकाणी वायफाय जोडलेच जात नसल्याचा अनुभव आहे. वायफाय जोडताना दोष निर्माण होत आहेत. त्यामुळे, सरकारच्या मोफत इंटरनेट सुविधेशी मुंबईकरांची ‘नाळ’ अद्याप जुळलेली नाही.
‘मुंबई वायफाय’च्या पहिल्या टप्प्यात शहरातील विविध ठिकाणी सुमारे ५०० हॉटस्पॉट तयार करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून केली होती. मुंबई वायफाय ही देशातीलच नव्हे तर जगातील सर्वात मोठी सार्वजनिक वायफाय सुविधा आहे. मुंबईतील पोलीस आयुक्त कार्यालय, विधान भवन, कलानगर, मुंबई उच्च न्यायालय त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम उपनगरांतील विविध भागांत महत्त्वाच्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध झाली आहे; परंतु मुंबईत मंत्रालय, गोरेगाव, चौपाटी परिसरांसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वायफाय जोडलेच जात नसून त्यासाठीचे पहिले ‘पान’ उघड होत नसल्याचा नागरिकांचा अनुभव आहे.
१ मेपासून सुमारे १२०० वायफाय हॉटस्पॉट प्रत्यक्ष सुरू होणार आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात लावण्यात आलेल्या ५०० वायफायपकी अनेक ठिकाणी वायफायची ‘रेंज’ पकडत नसल्याचे समोर येत आहे. मोबाइलवर वायफाय ‘कनेक्ट’ केल्यावर जोडणी झाल्याचे दिसून येते. मात्र वापरकर्त्यांना प्रत्यक्षात जोडणी मिळालेलीच नसते, असा अनुभव एका वापरकर्त्यांने सांगितले.
‘आपले सरकार’च्या माहिती तंत्रज्ञान विभागाशी संपर्क केला असता अधिकाऱ्याने, समस्या सोडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
गेले दोन दिवस मी नरिमन पॉइंट मंत्रालय परिसरातील वायफाय टॉवरच्या खाली वायफाय जोडण्याचा करण्याचा प्रयत्न करतो आहे. दोन दिवस एक तास वायफाय जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तेथे ‘कनेक्टिव्हिटी’ प्रतीक्षेत असल्याचे दिसून येते.
– राधेश्याम यादव, नागरिक
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2017 12:31 am