समुद्राचे पाणी गोडे करुन मुंबईकरांची तहान भागवणाऱ्या प्रकल्पावर १६०० कोटी रुपये खर्च होणार आहेत. खरंच हा महागडा प्रकल्प मुंबईकरांना परवडणारा आहे का? अशी विचारणा करत या प्रकल्पाचा फेरविचार करावा अशी मागणी करणारं पत्र भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे. २०० एमएलडी खारं पाणी गोडं करण्याचा खर्च हा १६०० कोटी रुपये इतका आहे. हा खर्च मुंबईकरांना परवडणार आहे का? असा प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.

 

मुंबईत मे आणि जून महिन्यात लोकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो. पाणी कपातीचं हे संकट टाळण्यासाठी मनोर येथील समुद्राचे २०० एमएलडी खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. निःक्षारीकरणाच्या प्रकल्प उभारीकरणाचा आढावा घेऊन पुढील प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. मात्र हा प्रकल्प खर्चिक आहे असं भाजपाने म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी या प्रकल्पाचा फेरविचार केला जावा असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलं आहे.