मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या मालकाला ताब्यात घेतल्याची माहिती मिळताच देवेंद्र फडणवीस विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यासोबत काल रात्री पोलीस ठाण्यात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कारवाईवरुन पोलिसांना जाब देखील विचारला. एवढच नाहीतर यादरम्यान भाजपा नेते आणि पोलिसांमध्येही शाब्दिक वाद झाले व यानंतर सर्वजण बीकेसीमधील पोलीस आयुक्तालयात पोहोचले असता तेथील चर्चेनंतर अधिकाऱ्याला सोडण्यात आलं. या सर्व घडामोडीमोडींच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना, पोलिसांवर दबाव टाकणं योग्य नाही, या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत. असा विरोधी पक्षनेत्यांना इशारा दिला.

ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात; फडणवीस आणि दरेकरांकडून पोलिसांची खरडपट्टी

गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले, “पोलिसांना माहिती मिळाली की मुंबईत जवळपास ५० हजार रेमडेसिवीर येत आहेत. त्या संदर्भात चौकशी करण्यासाठी ब्रुक्स फार्मा या कंपनीच्या संचालकांना पोलिसांनी काल पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं असता, त्या ठिकाणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर व त्यांचे अन्य सहाकारी त्या ठिकाणी पोहचले. यानंतर त्यांनी प्रश्न उपस्थित केला की या व्यक्तीला या ठिकाणी का व कशासाठी बोलावलं गेलं आहे. जर एखाद्या प्रकरणात पोलिसांना चौकशी करावीशी वाटली तर पोलिस कोणालाही बोलावू शकतात, त्या दृष्टीने त्यांना बोलावण्यात आले होते. या ठिकाणी पोलिसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एकप्रकारे शासकीय कामात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी या निमित्त एवढंच सांगू इच्छितो अशाप्रकार पोलिसांवर दबाव टाकणं हे योग्य नाही. या दृष्टीकोनातून या पुढील काळात अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत.”

तसेच, “या प्रकरणी कारवाई संदर्भात मी आमच्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करतो आहे आणि योग्य तो निर्णय घेतला जाईल. हा जो साठा आहे तो नेमका कुठे जाणार होता? कोणाला दिला जाणार होता? सरकारला दिला जाणार होता की एखाद्या राजकीय पक्षाला दिला जाणार होता. या संदर्भात मुंबई पोलिसांना संपूर्ण चौकशी करण्यास सांगितले आहे. अशी देखील माहिती आहे की केवळ एवढाच साठा नसून यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे.” अशी देखील यावेळी गृहमंत्र्यांनी माहिती दिली.

“मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिली अन् त्यानंतर….,” फडणवीसांचा गंभीर आरोप

दरम्यान कारवाईवर प्रश्चचिन्ह उपस्थित करत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत. एका मंत्र्यांच्या ओएसडीने दुपारी फोन करून धमकी दिल्यानंतर कारवाई करण्यात आला असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. “महाराष्ट्राला रेमडेसिवीर मिळाव्यात या प्रामाणिक हेतूने आम्ही सारे प्रयत्न करीत असताना अचानक ब्रुक फार्माच्या अधिकाऱ्याला ताब्यात घेण्याचा महाराष्ट्र सरकारने केलेला प्रकार अतिशय दुर्दैवी, गंभीर आणि चिंताजनक आहे,” असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

राज्याचे दोन्ही विरोधी पक्षनेते पोलीस ठाण्यात का गेले?; नवाब मलिकांकडून गंभीर आरोप

तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेत्यांवर याप्रकरणी टीका केलेली आहे. “देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड हे सर्वणज रात्री सव्वा अकरा वाजता बीकेसीला पोहोचले. जर पोलिसांना माहिती मिळाली तर ते चौकशी करतात. मग या डोकानियाला सोडवण्यासाठी या राज्याचे दोन-दोन विरोधी पक्षनेते आणि आमदार का गेले? राज्यात कुठेतरी भाजपाची लोकं साठा मिळणार नाही यासाठी प्रयत्न करत आहेत. जो साठा आहे तो विकत घेऊन आपण विकू ही भूमिका घेत आहेत. साठा देऊ शकतात त्यांना ऑर्डर द्या अशी भूमिका घेत आहेत. पण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीला बोलावल्यानंतर हे नेते का जातात हा मोठा प्रश्न आहे,” असं मलिक यांनी म्हटलेलं आहे.

“रेमडेसिवीरच्या तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करु नये का?”

“एका व्यावसायिकासाठी देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर मध्यरात्री धाऊन जातात आणि मुंबई पोलिसांवर दबाव आणतात हे आश्चर्यकारक आहे. महामारीमध्ये रेमडेसीवीरचा तुटवड्यामुळे माणसं मरत असताना मुंबई पोलिसांनी साधी चौकशीही करु नये का?” असा काँग्रेस प्रवक्ते सवाल सचिन सावंत यांनी भाजपा नेत्यांना केला आहे.