पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये होणार असून या वेळी युतीसंदर्भात कोणतीही घोषणा होणार नाही. परंतु, जागावाटपाचा तिढा पुढील तीन दिवसांत सुटेल, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

महाजनादेश यात्रेच्या समारोप कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युती झाल्यास २४० हून अधिक जागा निवडून येतील. शिवसेनेने नुकतीच २८८ जागांसाठी आढावा बैठक घेतली. त्यांना तसा अधिकार आहे. भाजपतर्फेही राज्यात अशा पद्धतीने सर्वेक्षण झाले आहे. ज्यांचे काम चांगले आहे, जनतेशी ज्यांची नाळ जुळलेली आहे, अशा नेत्यांना पक्षात सामावून घेतले आहे. निवडणुकीत अशा १५ मातब्बर नेत्यांना तिकिटे दिले जातील. उर्वरित जागांसाठी निष्ठावंतांचा विचार होईल.