कुठलाही रोजगार मिळत नसल्याने परिसरात फिरुन भंगार गोळा करणाऱ्या जनाबाई गवळी (४४) या महिलेला आपला प्राण गमविण्याची वेळ आली. बुधवारी ही घटना घडली. नेहेरोली येथील हर्षल स्टील कंपनीबाहेर टाकलेल्या राखेच्या ढिगारात भंगार शोधताना ही महिला गाडली गेली.
वाडा तालुक्यातील डोंगरपाडा येथील अनेक मजूरांना काम मिळत नसल्याने परिसरात असलेल्या लोखंडाच्या कंपन्यांनी टाकून दिलेला कचऱ्यातून भंगार गोळा करुन त्याची विक्री करुन अनेक जण आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी सकाळी जनाबाई आपल्या मुलासह येथील हर्षद कंपनीबाहेर फेकलेल्या राखेच्या ढिगाऱ्यातून भंगार शोधत होत्या. यावेळी राखेचा ढिगार अंगावर कोसळल्याने त्या गाडल्या गेल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा निलेश हा कंबरेपर्यंत गाडला गेला. यावेळी आसपासच्या नागरिकांनी बाहेर काढून त्याचे प्राण वाचविले. वाडा पोलिसांत याबाबत आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे.