‘साहित्याचा मानव समाजावरील प्रभाव’ विषयावर मंथन

मुंबई : ‘स्त्री आधार केंद्र’, ‘मुंबई मराठी पत्रकार संघ’ आणि ‘महिला आर्थिक विकास महामंडळ’ या संस्थांनी ‘साहित्य मंजिरी’ या महिला साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन २५ आणि २६ सप्टेंबरला दुपारी २.३० ते संध्याकाळी ५ या वेळेत डिजिटल माध्यमांद्वारे पार पडेल. साहित्याचा समाजमानसावर काही प्रभाव पडतो का किंवा लेखणीच्या माध्यमातून समाजमन घडवण्याचे काम उत्तमरीत्या केले जाते आहे का, अशा प्रश्नांचा उलगडा करण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

संमेलनाच्या अध्यक्षा लेखिका मंगला गोडबोले असून विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या स्वागताध्यक्षा आहेत. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि ‘महिला आर्थिक विकास महामंडळा’च्या अध्यक्षा ज्योती ठाकरे यांचादेखील उद्घाटन सत्रात सहभाग असणार आहेत. या साहित्य संमेलनात काही परिसंवाद आणि कवयित्री संमेलने होतील. काही प्रख्यात लेखिकांचा आणि कवयित्रींचा यात सहभाग असेल.

उत्तरा मोने यांच्या ‘मिती क्रिएशन्स’ या संस्थेने या संपूर्ण कार्यक्रमाचे संयोजन केले आहे. संमेलनाचा समारोप मुंबई मराठी पत्रकार संघाचे विश्वस्त प्रकाश कुलकर्णी करतील. समारोप सत्रात संमेलनाच्या अध्यक्षा मंगला गोडबोले यांचे भाषण होईल. या वेळी  महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, स्वागताध्यक्षा डॉ. नीलम गोऱ्हे आणि उत्तरा मोनेदेखील उपस्थित असतील. ‘साहित्य मंजिरी’ हा कार्यक्रम डिजिटल माध्यमांद्वारे होत असल्याने देशविदेशातील सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुला असणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी रसिकांनी  https://www.facebook.com/mitigroup  या लिंकवर जाऊन ‘मिती ग्रुप’ हे फेसबुक पेज लाइक करावे.

परिसंवाद आणि कवयित्री संमेलन

संमेलनाच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सत्रात ‘महिलांच्या सर्जनशील साहित्याची नवी परिमाणे’ या परिसंवादात मोनिका गजेंद्रगडकर, राही भिडे, रोहिणी निनावे या लेखिकांचा सहभाग असणार आहे. वैजयंती कुलकर्णी या परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. दुसऱ्या सत्रातील कवयित्री संमेलनात अनुपमा उजगरे, अंजली कुलकर्णी, छाया कोरगावकर सहभागी होतील.  दुसऱ्या दिवशी, पहिल्या सत्रात ‘लेखिकांच्या नजरेतून बदलते नातेसंबंध’ या परिसंवादात सिसिलिया काव्‍‌र्हालो, नीरजा, शिल्पा कांबळे सहभागी होणार आहेत. डॉ. मंजूषा मोळवणे या परिसंवादाचे सूत्रसंचालन करतील. तसेच दुसऱ्या सत्रातील कवयित्री संमेलनात नीरजा, योगिनी राऊळ, मंदाकिनी पाटील यांचा सहभाग असेल.