सुशांत मोरे

मध्य, पश्चिम मार्गावरील ८८ पुलांची कामे सुरू; पावसाळ्यात गर्दीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न

एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर रेल्वेतर्फे हाती घेण्यात आलेल्या पादचारी पुलांच्या कामांमुळे यंदाच्या पावसाळय़ात मुंबई आणि उपनगरांतील अनेक स्थानकांत गर्दीच्या व्यवस्थापनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सध्या ८८ पुलांची उभारणी आणि जुन्या पुलांच्या दुरुस्तीचे कामे सुरू असून पावसाळय़ातही ही कामे सुरूच राहणार आहेत. त्यामुळे स्थानकांतील गर्दीचा भार सध्या खुल्या असलेल्या पुलांवर एकवटला जाणार आहे. अशा वेळी पावसाळय़ात चेंगराचेंगरी होण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुलांची कामे पाहता पश्चिम व मध्य रेल्वेवर संबंधित विभागांची बैठकही पार पडली व सुरू असलेल्या कामांमुळे गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याच्या सूचना रेल्वे अधिकारी व सुरक्षा दलाला दिल्या आहेत. तसेच रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांसोबतच महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) तुकडय़ाही सज्ज ठेवण्यात येणार आहेत. एल्फिन्स्टन रोड स्थानकातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर सध्याच्या पादचारी पुलांची दुरुस्ती व नवीन पुलांच्या कामांना गती देण्याचे आदेश रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिले. या अपघातानंतर पश्चिम व मध्य रेल्वेवर ४४ पूल बांधण्यात आले. २०१४ पासून ते आतापर्यंत एकूण ८७ पूल बांधण्यात आले. फेब्रुवारी २०१९ मध्ये सादर झालेल्या अर्थसंकल्पात गोयल यांनी येत्या दोन वर्षांत १२५ पादचारी पूल उभारले जाण्याची घोषणाही केली आहे. त्यानुसार मुंबई उपनगरीय रेल्वे स्थानकांत पादचारी पूल व उड्डाणपुलांची कामे प्राधान्याने हाती घेतली आहेत. पश्चिम व मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकांवर सध्या ५४ नवीन पादचारी पूल उभारणी आणि ३४ जुन्या पुलांची दुरुस्ती कामे होत आहेत. ५४ पुलांमध्ये मध्य रेल्वेवरील १५ आणि पश्चिम रेल्वेवरील ३९ नवीन पुलांचा समावेश आहे. तर दुरुस्तीच्या ३४ पुलांमध्ये १४ मध्य रेल्वेवरील आणि २० पश्चिम रेल्वेवरील पूल आहेत.

ज्या ठिकाणी पूल नाही तेथे नवीन पूल आणि जुना पूल पाडून नवीन पुलांची कामे होत आहेत. पूल उभारणी व दुरुस्ती कामांमुळे स्थानकातील उर्वरित पुलांचा वापर प्रवासी करताना दिसतात. परंतु ऐन गर्दीच्या वेळी उर्वरित पुलांवर मोठा भार पडतो व धक्काबुक्की होत असते. मात्र चेंगराचेंगरी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ज्या ठिकाणी पुलांची कामे सुरू आहेत, तेथे रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस तैनात केले आहेत.  जून महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ापासून पावसाला सुरुवात होत असून पादचारी पुलांची कामे पावसाळ्यातही सुरू राहणार आहेत. नवीन पुलांच्या कामासाठी वर्षभराचा कालावधी आधीच नियोजित केलेला आहे. जुन्या पुलांच्या दुरुस्तीची कामे मेअखेर किंवा जुलै महिन्याच्या आत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पश्चिम व मध्य रेल्वेने ठेवले आहे.

मध्य रेल्वेवरील पुलांची सद्य:स्थिती

* विक्रोळी, मुलुंड, ठाकुर्ली, डोंबिवली, टिटवाळा, वाशिंद, आसनगाव, आटगाव, खर्डीसह काही स्थानकांत एकूण १५ नवीन पादचारी पुलांचे काम सुरू.

* मस्जिद स्थानकात दोन, कुर्ला, माटुंगा, दादर, विक्रोळी, भांडुप, ठाणेसह एकूण १४ जुन्या पादचारी पुलांची दुरुस्ती कामे सुरू.

* भांडुप स्थानकातील पूल पाडण्यात आला असून ठाणे, वडाळा स्थानकांतील दोन (यात बीपीटीचा एक), शिवडी, कुर्ला स्थानकांतील दोन (एक रेल्वे व एक पालिका पूल) आणि विद्याविहार स्थानकातील पूल धोकादायक असल्याने प्रवाशांसाठी बंद केले आहेत. तर कल्याणमधील लोकग्राम पूलही बंद केला आहे.

* जीटीबी नगर, दादर आणि ठाणे स्थानकांतील एका पुलाचे सुरक्षिततेच्या दृष्टीने त्वरित डागडुजीचे काम पूर्ण.

-सायन-कुर्ला, जीटीबीनगर, चेंदणी बंदर, धारावी पादचारी पुलांचे दुरुस्ती कामे पूर्ण.

पश्चिम रेल्वेवरील पुलांची सद्य:स्थिती

* ३९ नवीन पादचारी पूल उभारणीची कामे सुरू. यात मरिन लाइन्स, मुंबई सेन्ट्रल, दादर, वांद्रे, विलेपार्ले, अंधेरीसह आणखी काही स्थानकांचा समावेश.

* २० पेक्षा जास्त पादचारी पूल व उड्डाणपुलांची दुरुस्ती होत असून यामध्ये मरिन लाइन्स, चर्नी रोड, मुंबई सेन्ट्रल, महालक्ष्मी, लोअर परळ, दादर, खार, विलेपार्ले, अंधेरी, बोरिवली, मीरा रोड, भाईंदरसह काही स्थानकांचा समावेश आहे. यात वांद्रे कलानगर, वसई रोड, धारावी यांसह काही उड्डाणपूलही आहेत.

पावसाळ्याच्या आधी पुलांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. तर नवीन पुलांची कामे ही सुरूच राहतील. या कामांमुळे गर्दी होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज आहे.

सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे