माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजप नेते यशवंत सिन्हा यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर तोफ डागली आहे. सरकारच्या अर्थविषयक धोरणांवर टीका करताना ते म्हणाले, ‘सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी लोकचळवळ होणे आवश्यक आहे.’ विदर्भातील अकोला येथे ‘शेतकरी जागर मंच’ या संस्थेकडून आयोजित एका कार्यक्रमात ते रविवारी बोलत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नोटाबंदी आणि जीएसटीच्या अंमलबजावणीवरुन केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

यावेळी दिवंगत समाजवादी नेते जयप्रकाश नारायण यांचा संदर्भ देताना सिन्हा म्हणाले, सध्या राजसत्तेवर नियंत्रणासाठी लोकचळवळी निर्माण होणे आवश्यक आहे. याला अकोल्यातूनच सुरुवात करायला हवी. आपण यापूर्वीपासूनच आर्थिक मंदीचा सामना करीत आहोत, त्याासाठी काहीतरी करायला हवे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सिन्हा म्हणाले, मोदींनी नुकतेच आपल्या एका भल्या मोठ्या भाषणात भारताच्या विकासाची माहिती दिली, हे सांगताना ते देशभरात किती कार्स आणि बाईक्स विकल्या याची माहिती देत होते. या विक्रीचा अर्थ देशाचा विकास होत आहे असा होतो का? असा सवाल करताना विक्री होत असली तरी निर्मिती होत आहे का? असा प्रतिप्रश्नही त्यांनी यावेळी केला.

नोटाबंदीबाबत बोलणे आपण टाळणार आहोत, कारण या अपयशाबाबत काय बोलायचे असे सिन्हा म्हणाले. जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो, तेव्हा आम्ही सरकारवर टीका करताना ‘कर दहशतवाद’ वर बोलत होतो. मात्र, आज सुरु असलेल्या दहशतवादावर बोलण्यास माझ्याकडे शब्दच नाहीत.

सिन्हा पुढे म्हणाले, खरंतरं जीएसटी हा Good and Simple Tax असायला हवा मात्र, सत्तेत आलेल्या लोकांनी याला Bad and Complicated Tax करुन टाकले. जीएसटीच्या अंमलबजावणीतील विसंगती दूर करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.

नुकतेच एका वर्तमानपत्रातील लेखामधून सिन्हा म्हणाले होते, ‘लोकांना काय वाटतय तेच मी सध्या बोलत आहे. मी झारखंड राज्यातील असून येथे यापूर्वी कधीही शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे मी पाहिले नाही. मात्र, काही दिवसांपासून इथला शेतकरी देखील आत्महत्या करीत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.