अंबरनाथमधील येथील दुर्गापाडा परिसरात एका ३४ वर्षीय तरुणाची भर दिवसा तीक्ष्ण हत्यारांनी हत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी बाराच्या दरम्यान घडली आहे. या तरुणाला उपचारासाठी उल्हासनगर येथील मध्यवर्ती रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अखिलेश पाटील हा मंगळवारी दुपारी दुर्गापाडा परिसरात बसला असताना, येथे दोन तरुणांसोबत त्याचा वाद झाला होता. या वादात समोरील दोन अज्ञात तरुणांनी अखिलेशवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्ल्यात अखिलेश गंभीररीत्या जखमी झाला. त्याला तात्काळ उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. अखिलेश हा ठेकेदारीचे काम करत असून  आर्थिक व्यवहारातून अखिलेशची हत्या झाल्याचा अंदाज आहे.