जेवण दिले नाही म्हणून झालेल्या वादातून एका महिलेची हत्या करण्यात आली. दहिसरच्या कोकणीपाडा येथे मंगळवारी पहाटे ही घटना घडली. संजू दुबे (२८) असे मृत महिलेचे नाव असून आरोपी जितेंद्र तिच्या घरी जेवणासाठी येत होता.
दहिसरच्या कोकणीपाडा येथे दुबे दांपत्य राहते. त्यांच्याकडे जितेंद्र दुबे हा  जेवणासाठी यायचा. खाणावळीचे तो त्यांना दरमहा दोन हजार तीनशे रुपये द्यायचा. जितेंद्रही त्याच कोकणीपाडा परिसरात राहतो. तो एम्ब्रॉयडरीचे काम करतो. शनिवारी रात्री तो नेहमीप्रमाणे दुबे यांच्या घरी जेवणासाठी आला. त्यावेळी संजू दुबे (२८) यांनी जेवण तयार केलेले नव्हते. त्यावरून त्याने संजू हिला मारहाण करून शिवीगाळ केली. संजू हिने पती सत्यप्रकाश घरी आल्यावर त्यांच्या कानावर झालेला प्रकार घातला. सत्यप्रकाशने मग जितेंद्रच्या घरी जाऊन जाब  विचारला आणि उद्यापासून जेवणासाठी घरी येऊ नको असे बजावले. त्यामुळे अपमानित झालेल्या जितेंद्रने संजू हिच्या  हत्येचा कट रचला. मंगळवारी पहाटे तीनच्या सुमारास तो दुबे यांच्या घराच्या खिडकीतून आत शिरला. त्यावेळी वाहनचालक असणारे सत्यप्रकाश कामावर गेले होते तर संजू ही झोपली होती. घरात त्यांची पुतणी नीतू हीसुद्धा झोपलेली होती. जितेंद्रने झोपेत असलेल्या संजू यांचा गळा आवळून हत्या केली. त्याने नितूचाही गळा दाबण्याचा प्रयत्न केला. दोघांना भगवती रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे संजूचा मृत्यू झाला.