युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. निवडणूक लढवणारे ते ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य आहेत. त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. मागच्या काही महिन्यांपासून ते वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. अखेर ती आज खरी ठरली. वरळी दक्षिण मुंबईतील मतदारसंघ असून हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. वरळीमध्ये उच्चभ्रू, मध्यमवर्गीय, कामगार वर्ग मोठया संख्येने आहे. वरळीमध्ये बीडीची चाळीच्या पूनर्विकासाचा प्रश्न प्रलंबित आहे. सध्या शिवसेनेचे सुनील शिंदे वरळीचे आमदार आहेत. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी सुद्धा विधानसभेत वरळीचे प्रतिनिधीत्व केले आहे. कसा आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास - १९६२ - माधव नारायण बीरजे (काँग्रेस) - १९६७ - माधव नारायण बीरजे (काँग्रेस) - १९७२ - शरद शंकर दीघे ( काँग्रेस) - १९७८ - प्रल्हाद कृष्णा कुरणे ( कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया) (मार्क्सवादी) - १९८० - शरद शंकर दीघे ( काँग्रेस) - १९८५ - विनिता दत्ता सामंत ( अपक्ष) - १९९०, १९९५, १९९९, २००४ - दत्ताजी नलावडे (शिवसेना) मतदारसंघ पूनर्रचना - २००९ - सचिन अहिर ( राष्ट्रवादी काँग्रेस) - २०१४ - सुनील शिंदे ( शिवसेना)