मुंबई-  जून महिना संपत आला तरी  मुसळधार पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. परिणामी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक राहिलेल्या नाही. त्यामुळे सोमवारपासून (२७ जून) संपूर्ण मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १० टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे. निर्णय पालिकेने घेतला आहे.  ठाणे, भिवंडी महानगरपालिकेसह इतर गावांना मुंबई पालिकेमार्फत केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्येही १० टक्के कपात केली जाणार आहे.

पावसाळा सुरू होऊन देखील मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रांमध्ये अत्यंत कमी पर्जन्यवृष्टी झाली आहे. जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत सरासरीपेक्षा सुमारे ७० टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत शुक्रवारपर्यंत या सर्व जलाशयांमध्ये मिळून फक्त १ लाख ४१ हजार ३८७ दशलक्ष लिटर म्हणजे ९.७७ टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच दिवशी हा जलसाठा १५.५४ टक्के इतका होता.

दमदार पावसाअभावी हीच परिस्थिती यापुढेही कायम राहिल्यास मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील जलसाठ्याची स्थिती सुधारेपर्यंत मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवार पासून दहा टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. पालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयातही १० टक्के कपात करण्यात येणार आहे.

पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन

निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता दैनंदिन पाणी वापर काटकसरीने आणि काळजीपूर्वक करावा असे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.