मुंबई : दिल्ली-मुंबई आणि कोलकाता या तीन शहरांतील करोना रुग्णसंख्येचा आलेख शुक्रवारी किंचित खाली सरकला, तरी उत्तर प्रदेश आणि कर्नाटकमधील बाधितांची संख्या उसळल्याने देशात चोवीस तासांतील रुग्णसंख्या २ लाख ६४ हजारांहून अधिक नोंदली गेली. राज्यात मात्र गुरुवारच्या तुलनेत कमी रुग्ण आढळले. गेल्या आठवडय़ाभरात मुंबईतील रुग्णसंख्येत चढउतार सुरू असून शुक्रवारी ११ हजार ३१७ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर दैनंदिन रुग्णसंख्येच्या दुप्पट म्हणजेच २२ हजारांहून अधिक रुग्ण करोनामुक्त झाले. मृतांची संख्या मात्र वाढली असून शुक्रवारी ९ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात ८०० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले असून ८८ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. सध्या मुंबई पालिकेच्या करोना उपचार केंद्रात सहा हजार ४३२ रुग्ण दाखल असून १६.८ टक्के रुग्णशय्या व्यापलेल्या आहेत. तर एका दिवसात तब्बल २२ हजार ०७३ रुग्ण करोनामुक्त झाले. शुक्रवारी ११ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्यामुळे आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या नऊ लाख ८१ हजारांच्या पुढे गेली आहे. मृतांची संख्या मात्र गेल्या काही दिवसांपासून वाढू लागली आहे. शुक्रवारी नऊ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. त्यात सहा रुग्णांचे वय ६० वर्षांवर होते. दरम्यान, भारतातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे संयुक्त राष्ट्रांकडून चिंता व्यक्त करण्यात आली असून पुढील काळात परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशाराही देण्यात आला आहे. चोवीस तासांत.. मुंबईतील करोना रुग्णांची संख्या २० हजारांपर्यंत गेल्यानंतर ही रुग्णसंख्या हळूहळू कमी होऊ लागली. शुक्रवारी दिवसभरात आढळलेल्या ११ हजार ३१७ रुग्णांपैकी ८४ टक्के म्हणजेच नऊ हजारांहून अधिक रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. राज्यात काय? राज्यातही करोनाचा आलेख घसरणीला लागला असून शुक्रवारी ४३,२११ नवीन रुग्णांची तर १९ मृत्यूंची नोंद झाली. राज्यात २३८ ओमायक्रॉनच्या रुग्णांची नोंद झाली.