दोन गाडय़ा कुंभमेळ्यासाठी पाठवल्याने चणचण

दर १२ वर्षांनी येणारा कुंभ मेळा यंदा उज्जन येथे होत असून तेथे महास्नानाची पर्वणी साधण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. पण याच कुंभ मेळ्यामुळे १२ डब्यांच्या गाडय़ा लवकरात लवकर हार्बर मार्गावर येण्याची ‘पर्वणी’ हुकली आहे. कुंभ मेळ्याच्या गर्दीचा विचार करून पश्चिम रेल्वेने काही गाडय़ा तेथे पाठवल्या आहेत. त्यात दोन लोकलचाही समावेश असल्याने पश्चिम रेल्वेकडून मध्य रेल्वेला मिळणाऱ्या गाडय़ांचे वेळापत्रक विस्कटले आहे.

सध्या उज्जैन येथे सिंहस्थ कुंभ मेळा चालू आहे. तेथील गर्दीचा विचार करून पश्चिम रेल्वेने आपल्या काही डेमू, मेमू आणि दोन लोकल गाडय़ा तेथे पाठवल्या आहेत. त्याच दरम्यान आयसीएफ, चेन्नई येथे सुटय़ा भागांचा तुटवडा निर्माण झाल्याने नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल महिन्यात पश्चिम रेल्वेवर अपेक्षित असलेल्या चार बंबार्डिअर गाडय़ा दाखल होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे बंबार्डिअर गाडय़ा मुंबईत दाखल होण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. पश्चिम रेल्वेवर बंबार्डिअर गाडय़ा दाखल झाल्यानंतर पश्चिम रेल्वेवरील सिमेन्स गाडय़ा मध्य रेल्वेवर पाठवण्यात येत आहेत. पण पश्चिम रेल्वेवर गेल्या महिन्याभरात एकही गाडी आली नसल्याने मध्य रेल्वेलाही गाडी मिळाली नाही. परिणामी हार्बर मार्गावरील ९ डब्यांच्या गाडय़ा १२ डब्यांच्या करण्यात अडचण उद्भवली आहे. त्यातच कुंभ मेळ्यासाठी दोन गाडय़ा पाठवल्याने एप्रिल अखेरीस आलेल्या बंबार्डिअर गाडय़ांच्या बदल्यात पश्चिम रेल्वेने मध्य रेल्वेला १२ डब्यांच्या दोन गाडय़ा दिलेल्या नाहीत. आता कुंभ मेळा संपल्यानंतर या गाडय़ा पुन्हा पश्चिम रेल्वेवर येतील. त्यानंतर आठवडाभराने त्या मध्य रेल्वेकडे दिल्या जातील.

पश्चिम रेल्वेकडून १२ डब्यांची एक गाडी मध्य रेल्वेवर दाखल झाल्यावर सध्या हार्बर मार्गावर चालणारी ९ डब्यांची एक गाडी सेवेतून बाजूला काढली जाते. या गाडीचे तीन-तीन डबे नऊ डब्यांच्या तीन गाडय़ांना जोडून त्या तीन गाडय़ा १२ डब्यांच्या केल्या जातात. त्यामुळे प. रेल्वेवरून आलेली गाडी आणि या तीन गाडय़ा, अशा चार गाडय़ा १२ डब्यांच्या बनून धावू शकतात. दोन गाडय़ा कमी मिळाल्याने हार्बर मार्गावर आठ १२ डब्यांच्या गाडय़ा येण्यास उशीर होणार असल्याचे म. रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडिअर सुनीलकुमार सूद यांनी स्पष्ट केले.