जकात चुकवून विविध प्रकारचा माल मुंबईत घेऊन आलेल्या १२ गाडय़ा पालिकेच्या बुद्धीसंपदा दक्षता विभागाच्या पथकाने दारुखाना, काळबादेवी, भातबाजार परिसरातून गुरुवारी ताब्यात घेतल्या. सुमारे १२ लाख रुपये चकात चुकवून या गाडय़ा मुंबईत आल्या होत्या. सध्या या गाडय़ा दादर येथील पालिकेच्या गॅरेजमध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
कापड, टाईल्स, लोखंड आणि अन्य काही प्रकारचा माल घेऊन १२ गाडय़ा जकात नाक्यवर जकात न भरताच गुरुवारी पहाटे मुंबईत आल्या होत्या. पालिकेच्या बुद्धीसंपदा दक्षता विभागाच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी सकाळी ५ ते १० या वेळेत दारुखाना, काळबादेवी, भातबाजार या परिसरात सापळा रचला. या परिसरात येणाऱ्या प्रत्येक गाडय़ांवर पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची करडी नजर होती. मिळालेल्या माहितीनुसार गाडय़ा दृष्टीस पडताच तात्काळ पालिका अधिकाऱ्यांनी त्या ताब्यात घेतल्या. एकूण १२ लाख रुपये जकात न भरताच या गाडय़ा मुंबईत आल्याचे उघडकीस आले असून या गाडय़ा पालिकेने ताब्यात घेतल्या आहेत.