राज्यातील मंत्री तसेच राजकारणी लग्नसमारंभ तसेच वाढदिवसांच्या समारंभावर कोटय़वधी रुपयांची उधळपट्टी करीत असतानाच पोलिसांनी मात्र आपल्या वेतनातील काही भाग दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचे ठरविले आहे. पोलिसांनी आपल्या वेतनातून १५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निधी मुख्यमंत्री निधीला देण्यात येणार आहे. राज्यातील पोलीस शिपाई ते उपनिरीक्षक यांचे एक दिवसांचे वेतन तर सहायक निरीक्षक ते महासंचालक यांचे दोन दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक देवेन भारती यांनी सांगितले.