दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्या लक्षात घेऊन गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने यंदा राज्यभरात एक हजार ४९४ जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. हेही वाचा- प्रत्यक्ष संपर्काविनाही यापुढे म्हाडा घरांची सोडत ; दलालांच्या घुसखोरीला अटकाव शक्य? एसटी महामंडळाने 'अमृत ज्येष्ठ नागरिक' योजनेतंर्गत ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास करण्याची सवलत दिली आहे. तसेच ६५ ते ७५ वर्षांदरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांनी दिवाळीदरम्यान या योजनेचा लाभ घेता येणार आहे. हेही वाचा- वातानुकूलित लोकलला वाढता प्रतिसाद ; पश्चिम रेल्वेवर एकाच दिवसांत १८ हजारांहून अधिक तिकिटांची विक्री दिवाळीच्या सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे गावी किंवा पर्यटनस्थळांना जाण्याचे बेत आखतात. यंदा दिवाळीला जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळाने दरवर्षीप्रमाणे नियमित बस फेऱ्यांबरोबरच एक हजार ४९४ जादा बसगाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्याटप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद प्रदेशातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येणार आहेत.