२५ गुंतवणूकदारांची महाराष्ट्रात गुंतवणूक

मुंबई : दुबईत सध्या सुरू असलेल्या ‘वर्ल्ड एक्स्पो’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदेत २५ गुंतवणूकदारांनी महाराष्ट्रात उद्योग उभारण्यासाठी सामंजस्य करार केले असून त्यातून एकूण १५,२६० कोटींची गुंतवणूक राज्यात होणार आहे. यामुळे दहा हजारांपेक्षा अधिक प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे.

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी झालेल्या सामंजस्य करारात जपानर, सिंगापूर, स्वीडन, कोरिया, जर्मनी, इटली व भारत या देशांच्या कंपन्यांनी वाहन व वाहन घटक, लॉजिस्टिक्स, प्राणवायू उत्पादन, ईव्ही, टेक्सटाइल, डेटा सेंटर, औषध निर्माण, जैवइंधन व तेल आणि वायू आदी विविध क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. यासह आर्थिक आणि औद्योगिक सहकार्यासाठी आफ्रिका इंडिया इकॉनॉमिक फाउंडेशनसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे.

याप्रसंगी अपर मुख्य सचिव (उद्योग) बलदेव सिंग, उद्योग आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन, सह.मुख्य कार्यकारी अधिकारी ए. एस. आर. रंगा नाईक व महाव्यवस्थापक (पणन व जनसंपर्क) अभिजित घोरपडे आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

१ ऑक्टोबर ते ३१ मार्च या कालावधी मध्ये दुबई (यूएई) येथे वर्ल्ड एक्स्पो या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनामध्ये १९० देश सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रांतील उद्योजक/गुंतवणूकदार, शासकीय विभाग सहभागी झाले आहेत. या प्रदर्शनात असलेल्या महाराष्ट्र पॅव्हेलियनचे उद्घाटन शुक्रवारी सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात झाले.