ठाण्यापलीकडचा रेल्वे प्रवास प्रवाशांसाठी जीवघेणा ठरत असून मंगळवारी मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावर घडलेल्या अपघातांमधील एकूण बळींची संख्या १७ पर्यंत पोहोचली आहे. या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू कल्याण, ठाणे आणि पनवेल या रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घडले आहेत.
मध्य आणि पश्चिम रेल्वेवर मंगळवार झालेल्या विविध अपघातांमध्ये १७ जणांचा मृत्यू झाला. लोकलमधील गर्दीमुळे धावत्या गाडीतून पडून, रेल्वे रुळ ओलांताना हे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ जणांचा मृत्यू झाला असून ठाणे आणि पनवेलच्या हद्दीत प्रत्येकी दोन मृत्यू झाले आहेत. तर डोंबिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाचा मृत्यू झाला आहे.  
१७ मृतांपैकी आठजणांची ओळख पटली नसून त्यांची बेवारस अशी नोंद करण्यात आली आहे. बेवारस मृतदेह हे पुरूषांचे आहेत. कल्याण येथील तीन ठाण्याच्या हद्दीतील एका मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही.
१७ जणांच्या मृत्यूची नोंद झालेली असताना पनवेल मध्ये एक पुरूष तर कल्याणमध्ये एक महिला जखमी झाल्याची घटना घडली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.