मुंबई : मराठी चित्रपटांच्या निर्मितीची संख्या वाढत आहे आणि हिंदी वा दाक्षिणात्य चित्रपटांच्या स्पर्धेला न घाबरता मराठी चित्रपट प्रदर्शित केले जातात, ही मराठी चित्रपटसृष्टीच्या प्रगतीच्या दृष्टीने सुखावणारी बाब आहे. मात्र, सध्या एकाच आठवड्यात सहा ते सात मराठी चित्रपट, महिन्याला २० ते २२ मराठी चित्रपट प्रदर्शित होत असल्याने धड कोणालाही चित्रपटगृहात नीट शो मिळत नाहीत. एकाच वेळी प्रदर्शनाची झुंबड उडाल्याने मराठी चित्रपटांची आपापसातच स्पर्धा सुरू असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मे महिन्यात सुट्टीचा काळ असूनही हिंदीत ‘रेड २’ वगळता एकही मोठा चित्रपट नाही, त्याच वेळी मराठीत मात्र १७ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
एप्रिल – मे महिन्यात सुट्टीचा काळ असल्याने मराठी चित्रपट निर्माते या दोन महिन्यांत चित्रपट प्रदर्शनावर जोर देतात. सध्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘आता थांबायचं नाय’ आणि ‘गुलकंद’ हे दोन नावाजलेल्या कलाकारांचे मोठे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या दोन्ही चित्रपटांना मुंबई – पुण्यासह ठिकठिकाणी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने सलग दुसऱ्या आठवड्यात या चित्रपटांचे शो सुरू आहेत. मात्र, या आठवड्यात आणखी तीन नवीन मराठी चित्रपटांची भर पडली आहे. प्रसिद्ध अभिनेता अंकुश चौधरीच्या ‘पीएसआय अर्जुन’ या चित्रपटासह ‘माझी प्रारतना’ आणि ‘२६ नोव्हेंबर’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. पुढच्या आठवड्यात १६ मे रोजी रोहन मापुस्कर दिग्दर्शित ‘एप्रिल, मे ९९’ , अभिनेता भरत जाधव, सुनील बर्वे आणि शरद पोंक्षे यांच्या भूमिका असलेला ‘बंजारा’ या दोन मोठ्या चित्रपटांसह ‘अमायरा’ आणि ‘खवीस’ असे चार मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.
सहा मराठी चित्रपट २३ मे रोजी
मे महिन्याच्या चौथ्या आठवड्यात ‘सजना’, ‘अहिल्याबाई होळकर’, ‘मंगलाष्टका रिटर्न्स’, ‘शातिर’, ‘पायवाटंची सावली’ आणि ‘वामा’ असे सहा मराठी चित्रपट एकाच वेळी प्रदर्शित होणार आहेत. २१ मार्च रोजीही अशाच प्रकारे सहा मराठी चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. एप्रिल महिन्यातही ‘अशी ही जमवाजमवी’, ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’, ‘सुशीला सुजीत’, ‘देवमाणूस’ अशा मोठ्या चित्रपटांसह दर आठवड्याला तीन – तीन मराठी चित्रपट प्रदर्शित झाले.
एप्रिल – मे महिन्यांत सुट्ट्या असल्याने निर्माते या दोन महिन्यांत चित्रपट प्रदर्शनावर अधिक भर देतात. एकाच वेळी सहा मराठी चित्रपट प्रदर्शित झाले तर मुंबई – पुणे अशा मोठ्या शहरांतील चित्रपटगृहात प्रत्येकाला कसेबसे एक ते दोन शो मिळतात. ग्रामीण भागात चित्रपटगृहांची संख्याच कमी असल्याने दिवसाला फार तर दोन ते तीन चित्रपटांना शो मिळू शकतात. शिवाय, एखादा चित्रपट आधीच्या आठवड्यात चांगला चालला असेल तर तोही पुढच्या आठवड्यात टिकून राहतो आणि मग नव्यांच्या शोवर गदा येते, अशी माहिती चित्रपट माध्यम जनसंपर्क अधिकारी गणेश गारगोटे यांनी दिली.
निर्मात्यांनी समन्वय साधण्याची गरज सई ताम्हणकर
मराठी चित्रपटांचा विस्तार होणे ही चांगली गोष्ट असली तरी चित्रपट प्रदर्शनात नियोजनबद्धता असणे आत्यंतिक गरजेचे आहे. नाही तर एकाच वेळी तीन ते चार मराठी चित्रपट प्रदर्शित होतात आणि आपण प्रेक्षक चित्रपट पाहायला येत नाही म्हणून आर्थिक अपयशाचे खापर त्यांच्यावर फोडणे योग्य नाही, असे मत अभिनेत्री सई ताम्हणकर हिने ‘गुलकंद’ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले होते. हीच वेळ आहे जेव्हा चित्रपट निर्मात्यांनी एकत्र येऊन प्रदर्शनाच्या तारखांसंदर्भात चर्चा करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आग्रही मत तिने व्यक्त केले