लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपताच मुंबई पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. मुंबईत राहणाऱ्या १७ पाकिस्तानी नागरिकांना मुंबई पोलिसांनी एक्झिट परमिट दिल्यानंतर त्यांनी देश सोडल्याची माहिती सूत्रांनी दिली. अल्पकालीन व्हिसावर तसेच पर्यटनासाठी हे पाकिस्तानी नागरीक भारतात आले होते.
एकूण १७ पाकिस्तानी नागरिक नोटीस मिळाल्यानंतर मायदेशी परतले आहेत. वैद्यकीय व्हिसावर आलेल्या पाकिस्तानी नागरिकांव्यतिरिक्त इतर सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्यासाठी दिलेली मुदत रविवारी रात्री (२७ एप्रिलला) संपुष्टात आली होती. तसेच वैद्यकीय व्हिसाधारक पाकिस्तानी नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पहलगाम हल्ल्यानंतर सरकारने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडून जायला सांगितले होते. त्यानुसार, सार्क व्हिसा असलेल्यांना २६ एप्रिलपर्यंत भारत सोडून जाण्यास सांगण्यात आले, वैद्यकीय व्हिसावरील नागरिकांना २९ एप्रिलपर्यंत परत जायचे आहे तर १२ प्रवर्गातील व्हिसाधारकांसाठी रविवारची मुदत होती. त्यात आगमनानंतर व्हिसा, व्यवसाय, चित्रपट, पत्रकार, ट्रान्झिट, परिषद, गिर्यारोहण, विद्यार्थी, अभ्यागत, गट पर्यटक, यात्रेकरू आणि गट यात्रेकरू यांचा समावेश आहे. मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारच्या घोषणेनंतर तात्काळ सर्व पाकिस्तानी नागरिकांना नोटीस बजावण्यास सुरूवात केली होती.
दीर्घ मुदतीचा व्हिसा, राजनैतिक किंवा अधिकाऱ्यांसाठी दिला जाणारा व्हिसा असणाऱ्यांना देश सोडून जाण्याच्या आदेशातून वगळण्यात आले आहे. दरम्यान, अल्पमुदतीच्या व्हिसावरील सर्वाधिक १,००० पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात आहेत. तसेच जवळपास ५,०५० पाकिस्तानी नागरिक दीर्घमुदतीच्या व्हिसावर राज्यात राहात आहेत. मुंबईतही १७ पाकिस्तानी नागरिक होते. कोणीही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता, गायब किंवा हरविलेला नाही. रविवारी किंवा सोमवारी सायंकाळपर्यंत सर्व पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठविले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले होते.
भारत व पाकिस्तानदरम्यानची थेट हवाई वाहतूक बंद असल्यामुळे हे पाकिस्तानी नागरिक थेट पाकिस्तानला न जाता इतर देशांमध्ये उतरून तिथून दुसऱ्या विमानाने मायदेशी परतले. मुंबईतून गेलेल्या बहुसंख्य पाकिस्तानी नागरिक आखाती देशातून मायदेशी गेल्याचा अंदाज आहे.
पाकिस्तानी नागरिकांना दिलेल्या मुदतीचा रविवार शेवटचा दिवस होता. त्या मुदतीत, म्हणजेच २३ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान ५३७ पाकिस्तानी नागरिक मायदेशी परतले आहेत. त्यात नऊ सनदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्वजण अटारी सीमेवरून पाकिस्तानला परतले आहेत. त्याच चार दिवसांच्या काळात (२३ ते २७ एप्रिल) ८५० भारतीय नागरिक पाकिस्तानहून भारतात परतले आहेत. या नागरिकांनीदेखील अटारी सीमेचाच वापर केला.