मुंबई : पालिकेची मुदत येत्या सात मार्चला संपत असल्याने पुढील आठवडय़ात स्थायी समितीची शेवटची बैठक पार पडणार आहे. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या कामांना, विकासकामांना मंजुरी मिळवण्यासाठी सत्ताधारी शिवसेनेची व प्रशासनाची घाई सुरू आहे. बैठकीत १८० प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात येणार आहेत. ७ मार्चला सध्याच्या पालिकेची मुदत संपत आहे. सत्ताधारी शिवसेनेने आपली सत्ता राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणूक कधी होईल हे अद्याप निश्चित नसले तरी मुदत संपण्याच्या आत विकासकामांचे प्रस्ताव मंजूर करून मग आचारसंहितेपूर्वी नारळ वाढवून घेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाचा आहे. पुढील आठवडय़ात होणारी बैठक ही स्थायी समितीची शेवटची बैठक असण्याची शक्यता आहे. रविवारी या बैठकीची कार्यक्रम पत्रिका सदस्यांना वितरित झाली असून १८० प्रस्ताव पटलावर ठेवण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये मोठय़ा प्रमाणावर नालेसफाईच्या कामांच्या प्रस्तावांचा समावेश आहे. तर पर्जन्य जलवाहिन्यांच्या विविध कामांच्या ३०० कोटींच्या निविदा महिन्यात प्रशासनाने घाईने मागवल्या होत्या. निविदा प्रक्रिया आटोपून याबाबतचे प्रस्तावही पटलावर ठेवण्यात येणार आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकण्यात आला होता. त्यांच्याशी संबंधित पाच कंत्राटदारांसह ३३ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. स्थायी समितीच्या बैठकीत अनेक प्रस्ताव मनमानी पद्धतीने मंजूर केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. स्थायी समितीत कोटय़वधींचा भ्रष्टाचार होत असल्याचेही आरोप केले होते. दरम्यान, पटलावर १८० प्रस्ताव ठेवल्याबद्दल भाजप आमदार अमित साटम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. सत्ता हाती जाईल या भीतीने शेवटच्या क्षणी मुंबईकरांचा पैसा जितका ओरबाडता येईल तितका ओरबाडण्याचा हा प्रयत्न असल्याची टीका त्यांनी केली आहे.