मुंबई : देवनार कचराभूमीत अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर साफ करण्यासाठी मुंबई महापालिकेने मागवलेल्या निविदा भरण्याकरीता तब्बल २१ कंपन्यांनी रस दाखवला आहे. पालिका मुख्यालयात शुक्रवारी पार पडलेल्या पूर्वबोली बैठकीला २१ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. पूर्वबोली बैठकीला भरघोस प्रतिसाद मिळाला असला तरी यापैकी प्रत्यक्षात किती कंपन्या निविदा भरतात ते येत्या आठ दहा दिवसांत समजू शकेल.
देवनार कचराभूमीची जागा धारावी पुनर्विकास प्रकल्पाला देण्यासाठी या जागेत अनेक वर्षांपासून साचलेले कचऱ्याचे डोंगर हटवून जमीन रिकामी करण्याचे आदेश राज्य सरकारने मुंबई महापालिकेला दिले असून हा जुना कचरा हटवण्यासाठी मुंबई महापालिकेने गेल्या आठवड्यात निविदा मागवल्या होत्या. या कचराभूमीवर एकूण १८५ लाख मेट्रीक टन कचऱ्याचे तब्बल ४० मीटर उंचीचे डोंगर असून हा कचरा हटवण्यासाठी सुमारे २३६८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच या कामासाठी किमान तीन वर्षे लागणार आहेत. निविदा भरण्यापूर्वीची पूर्वबोली बैठक पालिका मुख्यालयात शुक्रवारी पार पडली. या बैठकीला २१ कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसराच्या पुनर्विकास प्रकल्पासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने संपूर्ण मुंबईतील विविध ठिकाणच्या जागांची मागणी केली आहे. या प्रकल्पातील अपात्र रहिवाशांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. देवनार कचराभूमीची १२४.३ एकर जागाही या प्रकल्पासाठी देण्याचा निर्णय सहा महिन्यांपूर्वी झाला आहे. मात्र देवनार कचराभूमीवर गेल्या सुमारे शंभर वर्षांपासून जुना कचरा साठला आहे. या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करून ही जमीन रिकामी करून देण्याची मागणी धारावी पुनर्विकास प्रकल्प प्राधिकरणाने केली आहे. कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर टाकण्यात आली असून महसूल व वन विभागाने पालिका आयुक्तांना पत्र लिहून ही जमीन रिकामी करण्याची विनंती फेब्रुवारी महिन्यात केली होती.
मुलुंड कचराभूमीवरील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या पद्धतीने बायोमायनिंगचा प्रकल्प हाती घेतला आहे. तसाच प्रकल्प देवनार कचराभूमीत उभारण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. इच्छुक निविदाकारांना ३ जूनपर्यंत निविदा भरता येणार आहेत. मुलुंड कचराभूमीतील जमीन चार वर्षात प्राप्त करण्यात येणार होती. प्रत्यक्षात सहा वर्षे झाली तरी हे काम अद्याप झालेले नाही. त्यामुळे देवनार कचराभूमी स्वच्छ करण्याचे काम तीन वर्षात कसे पूर्ण होणार याबाबत उत्सुकता आहे.
कोणत्या कंपन्या इच्छुक ?
देवनार कचराभूमवरील कचरा साफ करण्यासाठी मुलुंड कचराभूमी साफ करण्याचे काम दिलेली कंत्राटदार कंपनी, देवनार येथील कचऱ्यापासून वीज निर्मितीचे कंत्राट दिलेली कंपनी अशा अनेक कंपन्या पुढे आल्या आहेत. मात्र त्यापैकी किती कंपन्या प्रत्यक्षात निविदा भरतील, किती कंपन्या पात्र होतील ते जून महिन्यात समजू शकेल. तसेच चेन्नई, हैदराबाद येथे कचरा विल्हेवाटीचे काम केलेल्या कंपन्याही पुढे आल्या आहेत. मात्र देवनार कचराभूमीचा प्रचंड व्याप पाहता तेवढी उलाढाल असलेली कंपनीच पात्र ठरू शकणार आहे.
असा असेल कामाचा व्याप
एकूण जुन्या कचऱ्याचे अंदाजित वजन – १८५ लाख मेट्रीक टन
एकूण व्याप्त जागा – ११० हेक्टर
कचरा हटवण्यासाठी एकूण अंदाजित खर्च – २,३६८ कोटी
कंत्राट कालावधी – तीन वर्षे (पावसाळासहित) दरदिवशी कचऱ्याची विल्हेवाट – २३ हजार मेट्रीक टन
दर दिवशी वाहनांची ये जा – १२०० प्रतिदिन