गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्या आरक्षित झालेल्या असतानाच एसटी महामंडळाने जादा गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. यंदा गणेशोत्सवनिमित्त कोकणासाठी एसटी महामंडळाने अडीच हजार जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातील २५ ऑगस्टपासून सुटणाऱ्या १ हजार ३०० जादा गाड्यांचे आरक्षण शनिवार, २५ जूनपासून सुरू होणार आहे. जादा गाड्या मुंबई, ठाणे, पालघर मधून उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण तिकीट खिडक्या, ऑनलाईन आणि एसटी महामंडळाकडून नियुक्त एजन्टकडूनही मिळणार आहे. या जादा गाड्यांव्यतिरिक्त ग्रुप आरक्षणासाठीही लवकरच एसटी उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्यास अधिक गाड्या सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने ठेवली आहे. यंदा गणेशोत्सवाला ३१ ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. अनेक जण साधारण चार ते पाच दिवस आधीच गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. यंदा रेल्वेगाड्यातील आरक्षण संपल्याने एसटी महामंडळाने जादा गाड्यांची घोषणा करून दिलासा दिला आहे.