मुंबई : मालेगावच्या महापौरांसह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या या खेळीमुळे काँग्रेसमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली असून, राष्ट्रवादीत अशाच पद्धतीने फूट पाडू, असा इशारा काँग्रेसने दिला. मालेगावच्या महापौर ताहेरा रशीद शेख, माजी आमदार रशीद शेख यांच्यासह काँग्रेसच्या २८ नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. महापौर आणि माजी आमदार रशीद शेख यांचे पुत्र व माजी आमदार असिफ शेख यांनी यापूर्वीच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्याच पुढाकाराने शहरातील काँग्रेसच्या २९ पैकी २८ जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. प्रत्येक राजकीय पक्षाला आपल्या पक्षाचा पाया विस्तारण्याचा अधिकार असतो. काँग्रेस पक्ष हा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असला तरी या पक्षातील लोकप्रतिनिधींनी पक्षात दाखल होण्याची इच्छा व्यक्त केली होती व त्यानुसार या सर्वाचा प्रवेश झाल्याचे अजित पवार यांनी सांगितले. सर्वच नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने मालेगावमध्ये काँग्रेसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या फोडाफोडीबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नाराजी व्यक्त केली. आम्हीही अशाच पद्धतीने राष्ट्रवादीत फोडाफोडी करू, असा इशारा पटोले यांनी दिला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या नगरपंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला दुसऱ्या क्रमांकाचे यश मिळाले, असे अजित पवार यांनी सांगितले.