मुंबई: पोषण आहाराच्या अभावामुळे एकीकडे महिलांमधील रक्तक्षयाचे(अॅनिमिया) प्रमाण वाढत असून दुसरीकडे त्यांच्यात स्थूलतेचे प्रमाणही गेल्या पाच वर्षांत वाढल्याचे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण पाचच्या ( एनएफएचएस ५) २०१९-२१ या दुसऱ्या टप्प्यातील अहवालातून निदर्शनास आले आहे. हा अहवाल नुकताच केंद्रीय आरोग्य विभागाने जाहीर केला आहे. महिलांच्या आरोग्याकडे मागील पाच वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे या अहवालातून अधोरेखित केले आहे. १५ ते ४९ वयोगटातील महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण ५३ टक्क्यांवरून ५७ टक्क्यांवर गेले आहे. यातही ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक ५८ टक्के तर शहरी भागात ५३ टक्के आहे. गर्भवती महिलांमधीलही रक्तक्षयाचे प्रमाण वाढले असून ५२ टक्के झाले आहे. २०१५-१६ मध्ये झालेल्या एनएफएचएस-४ मध्ये हे प्रमाण ५० टक्के होते. ग्रामीण भागातील गर्भवती महिलांचे प्रमाण रक्तक्षयाचे प्रमाण सर्वाधिक ५४ टक्के तर शहरी भागात ४५ टक्के आहे. किशोरवयीन मुलींमध्येही समस्या महिलांसोबतच १५ ते १९ वयोगटातील मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाणही नोंद घेण्याइतपत वाढले आहे. मुलींमध्ये मागील पाच वर्षांत हे प्रमाण ५४ टक्क्यांवरून ५९ टक्क्यांवर गेले आहे. ग्रामीण भागातील मुलींमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सर्वाधिक ६० टक्के असून शहरी भागात ५६ टक्के आहे. पुरुषांमध्येही वाढते प्रमाण पोषण आहाराच्या अभावामुळे पुरुषांमध्येही रक्तक्षयाचे प्रमाण वाढत आहे. मागील पाच वर्षांत पुरुषांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण २२ टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर गेला आहे. ग्रामीण भागात पुरुषांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक २७ टक्के तर शहरी भागात २० टक्के आहे. मुलांमधील प्रमाण ३१ टक्क्यांवर मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये रक्तक्षय वाढीचे प्रमाण कमी असले तरी मागील पाच वर्षांत हे प्रमाण २९ वरून ३१ टक्क्यांवर गेले आहे. ग्रामीण भागातील मुलांमध्ये हे प्रमाण ३३ टक्के आहे, तर शहरी भागात २५ टक्के आहे. शहरी भागातील महिलांमधील स्थूलपणा महिलांमध्ये स्थूलपणाचे प्रमाण मागील वर्षांत वाढले असून १८ टक्क्यांवरून २२ टक्क्यांवर गेले आहे. शहरी भागात हे प्रमाण ३३ टक्के तर ग्रामीण भागात १९ टक्के आहे. तर दुसरीकडे बॉडी मास इंडेक्स(बीएमआय) सामान्य पातळीपेक्षाही कमी असण्याचे प्रमाण महिलांमध्ये २२ टक्क्यांवरून १८ टक्के झाले आहे. ग्रामीण भागामध्ये बीएमआय सामान्य पातळीपेक्षाही कमी असण्याचे प्रमाण सर्वात जास्त २१ टक्के आहे, तर शहरी भागात १३ टक्के आहे. पुरुषांमध्येही स्थूलपणाचे प्रमाण गेल्या पाच वर्षांत चार टक्क्यांनी वाढले आहे. दुसरीकडे पुरुषांमध्येही बीएमआय सामान्य पातळीपेक्षाही कमी होण्याचे प्रमाण २० टक्क्यावरून १६ टक्क्यांवर आले आहे. यातही ग्रामीण भागात हे प्रमाण अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत कमरेखाली स्थूलपणा वाढण्याचे प्रमाण महिलांमध्ये अधिक आहे. महिलांमध्ये हे प्रमाण ५६ टक्के आहे, तर पुरुषांमध्ये ४७ टक्के आहे. बालकांमध्ये रक्तक्षयाच्या प्रमाणात नऊ टक्के वाढ पाच वर्षांखालील बालकांमध्येही एकीकडे स्थूलपणा वाढत असून दुसरीकडे रक्तक्षयाचे प्रमाणही वाढत आहे. या बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण पाच वर्षांत ५८ टक्क्यांवरून ६७ टक्क्यांवर गेले आहे. ग्रामीण भागात हे प्रमाण सर्वाधिक ६८ टक्के तर शहरी भागात ६४ टक्के आहे. पाच वर्षांखालील बालकांमध्ये स्थूलपणाही पाच वर्षांत २ टक्क्यांवरून सुमारे साडे तीन टक्क्यांपर्यत वाढले आहे. शहरी भागात हे प्रमाण अधिक ४.२ टक्के तर ग्रामीण भागात ३.२ टक्के आहे. आहारातील बदल, निकृष्ट अन्न कारणीभूत रक्तक्षय हा आजार आहाराशी निगडित असून गेल्या काही वर्षांत आहारामध्ये होणारे बदल यास कारणीभूत आहेत. ग्रामीण भागात आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे पुरेसा पोषण आहार मिळत नाही हे एक कारण आहेच. परंतु दुसरीकडे कमी पैश्यात उपलब्ध होणारे निकृष्ट दर्जाचे अन्न हे देखील यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. रक्तक्षय झाल्याचे अनेकदा लक्षात येत नाही. मासिक पाळीमध्ये प्रमाणापेक्षाही जास्त रक्तस्राव होत असेल तरीही महिला दुर्लक्ष करतात, असेही आढळले आहे. त्यामुळे महिलांनी स्वत:ला आणि मुलींना प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्राव झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच दुसरीकडे महिला आणि मुलींमधील स्थूलताही वाढत असल्याचे आढळत आहे. आहार आणि व्यायाम याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे मत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रेखा डावर यांनी व्यक्त केले.