राज्यातील वीजेचे दर ३० ते ३५ टक्क्य़ांनी करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली. वीज कंपनीचा खर्च, भ्रष्टाचार, फुगविलेले प्रकल्प खर्च कमी केले आणि कार्यक्षमता वाढविली, तर हे सहज शक्य आहे. जनतेकडून खर्चाच्या तुलनेत जादा वीजबिल वसुली केली जात असून राज्य वीज नियामक आयोगाने गेल्यावर्षी मंजूर केलेली वीजदरवाढ मागे घेण्यात यावी आणि आयोगानेही दर कमी करण्याच्या केलेल्या सूचनेचे पालन सरकारने करावे, अशी मागणीही खडसे यांनी केली. रिलायन्सच्या नवीन प्रकल्पातील सुमारे दोन हजार मेगावॉट स्वस्त वीज सरकार खरेदी करीत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.घरगुतीसह व्यावसायिक आणि उद्योगांनाही साडेसहा ते १२ रुपयांपर्यंत प्रतियुनिट वीजदर आकारला जात आहे. त्यामुळे उद्योग अन्य राज्यांमध्ये स्थलांतरित होत आहेत असे खडसे यांनी सांगितले.