कोकण मंडळाच्या २०२१च्या सोडतीतील १२०७ घरे परत; २४३६ विजेत्यांच्या कागदपत्रांची प्रतीक्षा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगल हनवते, लोकसत्ता

मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीसाठी लाखोंच्या संख्येने अर्ज सादर होत  असले तरी प्रत्यक्षात घरांना प्रतिसाद मिळत नसून घरे नाकारण्यात येत आहेत. २०१८ च्या सोडतीपाठोपाठ आता २०२१ च्या ८,९८४ घरांच्या सोडतीतील तब्बल ३,६४३ विजेत्यांनी घरे नाकारली आहेत. यापैकी १,२०७ घरे विजेत्यांनी परतही केली आहेत. त्याचवेळी २,४३६ घरांसाठी विजेत्यांनी कागदपत्रेच सादर कलेली नाहीत. 

 कोकण मंडळाने ऑक्टोबर २०२१ मध्ये ८,९८४ घरांसाठी सोडत काढली होती. या सोडतीला तब्बल दोन लाख ४६ हजार अर्ज सादर झाले होते. यापैकी दोन लाख ७ हजार अर्ज २० टक्क्यांतील ८१२ घरांसाठी होते. सोडतीला अर्जदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र आता पात्रता निश्चितीच्या वेळी मोठय़ा संख्येने विजेत्यांनी घरे नाकारली आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, या सोडतीतील ८,९८४ पैकी ३,६४३ घरे विजेत्यांनी नाकारली आहेत. यापैकी १,२०७ घरे विजेत्यांनी म्हाडाला परतही केली. यात २० टक्क्यांतील ८१, कोकण मंडळाच्या गृहयोजनेतील २७४ आणि पंतप्रधान आवास योजनेतील ८५२ घरांचा समावेश आहे.           

म्हाडाने ऑनलाइन पद्धतीने घरे परत करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यात घरे परत करण्याचे कारण नमूद करण्याची सोय नाही. त्यामुळे ही घरे नेमकी का परत करण्यात आली हे समजू शकलेले नाही.   दुसरीकडे २,४३६ घरांच्या विजेत्यांनी कागदपत्रेच जमा केलेली नाहीत. यात पंतप्रधान आवास योजनेतील १,९५१, कोकण मंडळाच्या गृहयोजनेतील ४३२ आणि २० टक्क्यांतील ५३ घरांचा समावेश आहे. कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र तरीही या विजेत्यांनी ती जमा केलेली नाहीत. एकूणच या सोडतीतील ३,६४३ विजेत्यांनी घरे नाकारली आहेत. यापूर्वी २०१८ च्या सोडतीमधील ३,९३७ घरे विजेत्यांनी नाकारली होती. त्यानंतर प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना संधी देण्यात आली होती. त्यानंतरही नाकारलेली घरे २०२१ च्या सोडतीत समाविष्ट करण्यात आली होती. आताही २०२१ च्या सोडतीतील ३,६४३ घरांसाठी प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार असल्याची माहिती कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

पंतप्रधान आवास योजनेतील घरांना नापसंती

विजेत्यांनी नाकारलेल्या ३,६४३ पैकी २,८०३ घरे ही पंतप्रधान आवास योजनेतील (पीएमएवाय) आहेत. पीएमएवाय योजनेतील घरे शहरापासून दूर असून येथे कोणत्याही पायाभूत सुविधा नाहीत, तसेच या घरांचे बांधकाम पूर्ण होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही घरे नाकारण्यात येत असल्याची चर्चा आहे. मात्र पीएमएवाय योजनेतील घरे नाकारली जात असल्याने कोकण मंडळाची चिंता वाढली आहे. यापूर्वीच्या सोडतीत पीएमएवायमधील घरेच नाकारण्यात आली होती.

विजेत्यांनी प्रतिसाद न दिलेल्या घरांसाठी प्रतीक्षायादीवरील विजेत्यांना संधी देण्यात येणार आहे. आता प्रतिसाद न मिळालेल्या घरांची संख्या अधिक दिसत आहे. मात्र भविष्यात त्यांची संख्या कमी होईल. यानंतरही रिकामी राहणारी घरे पुढील सोडतीत समाविष्ट करण्यात येतील. भविष्यात ही घरे रिकामी राहणार नाहीत.

 –  नितीन महाजनमुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडा

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3500 winners denied mhada home zws
First published on: 29-06-2022 at 00:08 IST