मुंबई : राज्यातील व्यापगत गृहप्रकल्पांना महारेराने नोटीसा बजावल्यानंतर ३६९९ गृहप्रकल्प पूर्ण झाल्याचे स्पष्ट करून त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. महारेराने मात्र हे प्रमाणपत्र योग्य, अधिकृत आहेत का याची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये बनावट कागदपत्रांद्वारे महारेराची, ग्राहकांची फसवणूक करण्यात अल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
या पार्श्वभूमीवर महारेराने हा निर्णय घेऊन ३६९९ प्रकल्पांच्या भोगवटा प्रमाणपत्राची सत्यता तपासणी करण्यासाठी महारेराने संबंधित नियोजन प्राधिकरणास पत्र पाठवले आहे. योग्य ती तपासणी करत १० दिवसांत त्याबाबतची माहिती महारेराला कळवावी अशा सूचनाही प्राधिकरणास देण्यात आली आहे.
एमएमआरमधील १८१९ प्रकल्पांचा समावेश
कल्याण-डोंबिवलीमध्ये बनावट प्रमाणपत्राद्वारे महारेराची आणि ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. याचा मोठा फटका ग्राहकांना बसला आहे. त्यामुळे यापुढे अशी घटना होऊ नये यासाठी आता महारेराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत भोगवटा प्रमाणपत्र महारेराकडे सादर करणाऱ्या व्यापगत ३६९९ प्रकल्पांच्या भोगवटा प्रमाणपत्राची सत्यता तपासली जाणार आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील १८१९, पुण्यातील १२२३, नाशिकमधील २७३, छत्रपती संभाजी नगरमधील १३२, अमरावतीतील ८४ आणि नागपूरमधील १६८ व्यापगत, मात्र प्रकल्प पूर्ण झालेल्या प्रकल्पांचे भोगवटा प्रमाणपत्र महारेराकडून महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. या प्रमाणपत्राची सत्यता तपासणी संबंधित नियोजन प्राधिकरणाने करावी असे पत्र सर्व संबंधित प्राधिकरणास पाठविण्यात आल्याचे महारेराकडून सांगण्यात आले.
दहा दिवसांत पडताळणी आवश्यक
महारेराचे पत्र मिळाल्यापासून दहा दिवसांत संबंधित प्राधिकरणाने भोगवटा प्रमाणपत्राची सत्यता पडताळणी करून भोगवटा प्रमाणपत्र खरे आहे याची माहिती महारेराला देणे आवश्यक आहे. दहा दिवसात संबंधित प्राधिकरणाकडून प्रतिसाद न मिळाल्यास प्रमाणपत्र खरे असल्याचे गृहीत धरण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर पुढे कधीही प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघडकीस आल्यास त्यासाठी संबंधित प्राधिकरण जबाबदार असेल अशी स्पष्ट भूमिकाही महारेराने घेतली आहे. त्यामुळे आता संबंधित प्राधिकरणाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि ३६९९ प्रकल्पांपैकी किती प्रकल्पातील प्रमाणपत्रे अधिकृत, खरे असल्याचे स्पष्ट होते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
क्षेत्रनिहाय ३६९९ प्रकल्प असे
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र – १८१९
मुंबई शहर – १०६
मुंबई उपनगर- ४३०
पालघर- १७५
रायगड- ४१५
रत्नागिरी-८६
सिंधुदुर्ग- ५०
ठाणे- ५५७
पुणे क्षेत्र – १२२३
पुणे – १०१५
कोल्हापूर- ४९
सांगली – ५५
सातारा- ६९
सोलापूर- ३५
नाशिक क्षेत्र – २७३
नाशिक- २२६
अहिल्यानगर- २३
धुळे- ३
जळगाव- १९
नंदुरबार- २
छ. संभाजीनगर क्षेत्र- १३२
छ. संभाजीनगर – १०१
बीड- ३
जालना- ९
लातूर- १०
नांदेड- ५
धाराशीव- ३
परभणी- १
अमरावती क्षेत्र- ८४
अमरावती – ४८
अकोला- १५
बुलडाणा- ७
वर्धा – ८
वाशिम – १
यवतमाळ – ५
नागपूर क्षेत्र – १६८
नागपूर – १४४
भंडारा – १
चंद्रपूर – २२
गडचिरोली – १