मुंबई: विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या महिन्याभरापासून सुरू असलेल्या संपामुळे एसटी महामंडळाचे ४३९ कोटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे राज्यातील एसटी गाडय़ांची होणारी धाव व कर्मचारी कर्तव्यावर रुजू होण्याचे प्रमाण अद्यापही कमीच आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल कायम असून सर्व मदार खासगी वाहतुकीवरच आहे. एसटीच्या कामगार संघटनांच्या कृती समितीने २७ ऑक्टोबरपासून महागाई भत्ता आणि अन्य मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले. २८ ऑक्टोबरला या मागण्यांसाठी अघोषित संप पुकारल्याने एसटी सेवा बंद झाली. विलीनीकरणाच्या मागणीसाठीही कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे संप पुकारला व तो अद्यापही कायमच आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आगारातून खासगी बसगाडय़ा, शालेय बस आणि इतर वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. आणखी ६१० कर्मचारी निलंबित मंगळवारी ६१० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले. त्यामुळे एकूण निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या ८ हजार १९५ झाली आहे, तर रोजंदारीवरील ८० कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती केल्याने ही संख्याही १ हजार ८२७ झाली आहे.