मुंबई : दैनंदिन करोना रुग्णसंख्येत गेल्या चार-पाच दिवसांपासून मोठी वाढ होऊ लागली असून शनिवारी ४८६ नव्या रुग्णांची नोंद झाली. गेल्या महिन्यात अडीचशे ते पावणेतीनशेच्या दरम्यान रुग्णसंख्या असताना बुधवारपासून ही संख्या चारशेच्या पुढे गेली आहे. उपचाराधीन रुग्णसंख्याही वाढली आहे. शनिवारी आढळलेल्या रुग्णांपैकी ९२ टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नाहीत. तर, ३७ जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ७ रुग्णांना प्राणवायू द्यावा लागला. दिवसभरात २८४ रुग्ण करोनामुक्त झाले. दैनंदिन रुग्णसंख्या कमी होत असताना चार-पाच दिवसांपासून अचानक रुग्णसंख्या वाढू लागली आहे. मात्र मोठय़ा संख्येने रुग्ण बरे होत असून करोनामुक्त रुग्णांचे प्रमाण ९८ टक्के आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली असून सध्या २ हजार ३२९ आहे. आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ११ लाख २७ हजारांवर गेली आहे. रुग्णवाढीचा दर ०.०३ टक्के झाला असून रुग्णदुपटीचा कालावधी कमी होऊन २,३२९ दिवसांवर आला. शनिवारी मृत्यू झालेले दोन्ही रुग्ण ६० वर्षांवरील पुरुष होते. या दोन्ही रुग्णांना दीर्घकालीन आजार होते, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले आहे. ठाणे जिल्ह्यात ९२५ सक्रिय रुग्ण ठाणे : ठाणे जिल्ह्यात शनिवारी १८० नवे करोना रुग्ण आढळले. या रुग्णांपैकी नवी मुंबई ७६, ठाणे ५९, मीरा भाईंदर २३, कल्याण डोंबिवली सात, उल्हासनगर सहा, भिवंडी पाच आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात चार रुग्ण आढळले. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ही ९२५ आहे.