मुंबई : दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अखेर राज्य सरकारने पाऊल उचलले आहे. त्यानुसार मुंबई महानगर प्रदेशातील ७५ हजार घरे शोधून काढली असून पुढील सहा महिने ते दोन वर्षांत या घरांचे वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे २२ वर्षांपासून हक्काच्या घराची प्रतीक्षा करणाऱ्या कामगारांना दिलासा मिळणार आहे. विविध गिरणी कामगार संघटनांनी शोधून काढलेली ठाण्यातील ११० एकर जागा लवकरच कामगारांच्या घरांसाठी म्हाडाला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या ११० एकर भूखंडावर किमान ५० हजार घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गिरण्यांच्या जमिनींवरील योजनेतील २५ हजार आणि ठाण्यातील ५० हजार घरे मिळून ७५ हजार कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्याची शक्यता आहे. आता आणखी ७५ हजार कामगारांना घरे मिळणार आहेत. किंमतीचा मुद्दा ठरणार कळीचा ही ७५ हजार घरे ३०० चौरस फुटांची आहेत. या घरांच्या किंमती गिरणी कामगारांच्या घरांच्या योजनेतील घरांच्या किमतीपेक्षा अधिक असल्याची माहिती गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे हेमंत राऊळ यांनी दिली. नऊ लाखांतच ही घरे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.