‘म्हाडा’च्या सोडतीत लोकप्रतिनिधींना मुंबईत हक्काचे घर वेतनवाढीमुळे एकीकडे आमदारांवर सध्या सर्व स्तरांतून टीका होत असताना आता त्यांना ‘म्हाडा’च्या लॉटरीतही घरासाठी असलेल्या आरक्षणाबद्दल अनेक नागरिक आता नाक मुरडताना दिसत आहेत. तरी लॉटरीत घर मिळाल्याने आमदार मात्र खूश असून मुंबईत हक्काचे घर मिळाल्याची भावना व्यक्त करत आहेत. मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या बुधवारी झालेल्या सोडतीत काही आजी-माजी आमदारांना घरे लागली असून यात भाजपकडून आमदारकी भूषविलेल्यांची संख्या जास्त आहे. घरांची सोडत निघाल्यापासूनच आजी-माजी आमदार व खासदार यांच्यासाठी सोडतीत दोन टक्के आरक्षण असून अनेकांनी आजवर यातून स्वस्तात घरे मिळाली आहेत. १९८१ साली सोडत सुरू झाल्यापासूनच आजी-माजी आमदार व खासदारांना घरे मिळत आहेत. मात्र, आमदार व खासदार यांच्या सध्याच्या जाहीर होणाऱ्या मालमत्ता पाहता त्यांना सामान्य नागरिकांच्या सोडतीत सहभागी करू नये अशी प्रतिक्रिया या सोडतीपूर्वी उमटली होती. सामान्यांची नाराजी याबाबत सध्या सामान्य नागरिकांच्या कोटय़ातून घरासाठी अर्ज करूनही घर न मिळालेले अंबरनाथमधील रहिवासी तुषार घोलप म्हणाले की, मी सोडतीसाठी गेल्या चार वर्षांपासून सतत अर्ज करत आहे. मात्र, आम्हाला आवश्यकता असूनही घर मिळत नाही. पण, अनेक वर्षांपासून भरपूर संपत्ती असलेल्या आमदारांना घरे मिळत आहेत. त्यांच्या वाटणीची घरे ही सामान्यांसाठीच सरकारने ठेवावीत. त्यामुळे, मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण झाल्याने आमदार मंडळी खूश असली तरी सामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या मुलालाही घर यंदा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे यांना उच्च उत्पन्न गटात पवई येथे घर मिळाले असून याबाबत त्यांच्याकडून जाणून घेतले असता त्यांनी सांगितले की, मुंबईत घर असण्याचे माझे स्वप्न होते. मी भोकरदन ते मुंबई नेहमी ये-जा करत असे. मात्र या घरामुळे मला मुंबईत कायमस्वरूपी घर मिळाले आहे.