मुंबई : पर्यावरण संवर्धनाच्या महाराष्ट्राच्या प्रयत्नांची संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषदेने दखल घेतली असून स्कॉटलंड येथे सुरू असलेल्या परिषदेत महाराष्ट्राला ‘इन्स्पायरिंग रिजनल लिडरशिप’ (प्रेरणादायी प्रादेशिक नेतृत्व) पुरस्कार मिळाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. हा पुरस्कार महाराष्ट्रातील जनतेला व देशाच्या पर्यावरण संवर्धन ध्येयास समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्राला ‘अंडर २ कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन’कडून हा पुरस्कार मिळाला आहे. स्कॉटलंडमध्ये ‘अंडर २ कोईलेशन फॉर क्लायमेट अ‍ॅक्शन’तर्फे तीनपैकी एक पुरस्कार जिंकणारे महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य आहे. शाश्वत भविष्यासाठी जगभरात क्लायमेट ग्रुप स्थानिक शासकीय संस्थांसह कार्यरत आहेत आणि त्यांच्यासह विविध उपाययोजनांवर आम्ही काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख मिळाल्याचे समाधान असल्याचेही पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी नमूद केले आहे.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वन्यजीव प्रेमी आणि संवर्धनवादी दृष्टिकोन असणारे नेते आहेत. त्यांनी आम्हाला चांगल्या आणि हरित भविष्याची स्वप्ने पाहण्याची संधी दिली आहे. पर्यावरण जपण्यासाठी आम्ही माझी वसुंधरा म्हणजेच ‘माय प्लॅनेट’ ही चळवळ सुरू केली आहे. त्याचबरोबर आम्ही पंचमहाभूतांवरही लक्ष केंद्रित करत आहोत. राज्य सरकार पारंपरिक ऊर्जेऐवजी स्वच्छ ऊर्जेचा विचार करीत आहे. नुकतेच एका महामार्गावर सौरऊर्जा निर्मितीची यंत्रणा बसवण्यात आली असून २५० मेगावॅट ऊर्जा निर्माण करणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.