मुंबईः दुबईहून परतलेल्या व्यक्तीचे मुंबईतून अपहरण करून १५ लाख रुपयांची खंडणी मागित्याचा प्रकार घडकीस आला असून याप्रकरणी शीव पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला  होता. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या पथकाने पॉन्डिचेरी येथे जाऊन अपहरण झालेल्या व्यक्तीची सुटका केली. याप्रकरणी आरोपींची शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दुबईत कामानिमित्त गेलेल्या ४७ वर्षीय व्यक्तीची मुंबईतील शीव परिसरातून अपहरण झाले. शंकर मथमल्ला असे या व्यक्तीचे नाव असून ते तेलंगणा येथील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा हरीश मथमल्ला यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मथमल्ला २२ जूनला दुबईहून मुंबईत आले होते. त्यानंतर शीव येथून त्यांनी गावी जाण्यासाठी बसचे तिकीट घेतले. पण ते घरीच पोहोचले नाही. त्यानंतर त्यांचा मुलगा व मेहूणा त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबईत आले. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी बसचे तिकीट रद्द केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर हरीशने शीव पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी शंकर बेपत्ता असल्याची नोंद केली. त्यानंतर शंकर यांनी स्वतः मुलाला दूरध्वनी करून आपण चेन्नईमध्ये रुग्णालयात भरती असल्याचे सांगितले. त्यानंतर दूरध्वनी बंद झाला. मुलाने वारंवार दूरध्वनी केला, पण दूरध्वनी लागला नाही. त्यानंतर त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून दूरध्वनी आला. त्यात तुमचा व्यक्तीला अल्सरवर उपचार घेत असल्याचे सांगून त्याने फोन बंद केला. त्यानंतर २८ जूनला तक्रारदाराच्या मुलाला विविध १० क्रमांकावरून दूरध्वनी आले, त्या व्यक्तीने १५ लाख रुपयांची मागणी केली. रक्कम दिल्यावर वडिलांना सोडण्यात येईल, असे सांगितले. त्यामुळे मुलाने घडलेला प्रकार शीव पोलिसांना सांगितला. त्यानुसार पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखाही याप्रकरणाचा समांतर तपास करीत होते. त्यासाठी एक पथक महाराष्ट्राबाहेर तपासासाठी गेले. त्यांनी पॉन्डिचेरी येथून शंकर यांची सुटका केली. दोन आरोपींनी शंकरचे अपहरण करून त्यांना मारहाण केली. त्यानंतर त्यांचे छायाचित्र मुलाला पाठवले व खंडणीची मागणी केली. शंकरला सध्या उपचारासाठी शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.