मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाचे स्वप्न पूर्ण करणारी वातानुकूलित लोकल गाडीच्या तांत्रिक चाचणीला गुरूवारपासून सुरूवात होणार आहे. कुर्ला कारशेडमध्ये ही तांत्रिक चाचणी पार पडणार आहे. तब्बल दोन आठवडे चालणाऱ्या या चाचणीत वातानुकूलित गाडीच्या एसी, दरवाजे आणि इतर यंत्रणेची तपासणी होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाड आणि उंचीच्या अडचणीमुळे ही लोकल कुर्ला कारशेडमध्ये धूळ खात पडली होती. मात्र, अखेर रेल्वे प्रशासनाला या गाडीच्या चाचणीसाठी मुहूर्त मिळाला आहे.

वातानुकुलित लोकलमुळे ‘परे’ व ‘मरे’ घामाघूम
वातानुकूलित लोकल गाडी प्रवाशांच्या सेवेत येण्यासाठी किमान चार ते पाच महिने जाणार आहेत. मात्र, उंचीच्या समस्येमुळे या गाडीला मुंबई शहराच्या हद्दीत प्रवेश मिळणे कठीणच असल्याचे चित्र आहे. मध्य रेल्वेवर अनेक ठिकाणी उंचीमुळे ही गाडी कुर्ल्याच्या पुढे येणार नसल्याचे याआधीच जाहीर करण्यात आले आहे. पण आता पश्चिम रेल्वेवरही चर्चगेट ते माहीम यांदरम्यान १० ते ११ ठिकाणी उंची कमी असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे ही गाडी पश्चिम रेल्वेवर चाललीच, तर वांद्रे ते विरार या पट्टय़ातच चालवावी लागणार आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला रेल्वे प्रशासनाकडून या समस्येवर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वातानुकूलित गाडीची उंची सध्याच्या बंबार्डिअर किंवा सिमेन्स कंपनीच्या गाडय़ांपेभा ५० ते ७५ मिमीने जास्त आहे. त्यामुळे या गाडीला माहीम, टिळक पूल, लोअर परळ या ठिकाणी आणि चर्चगेट ते महालक्ष्मी यांदरम्यान आणखी आठ ते नऊ ठिकाणी समस्येचा सामना करावा लागणार आहे. या ११ ते १२ ठिकाणांपैकी सहा ते सात ठिकाणी ओव्हरहेड वायर वर करून किंवा रेल्वे रूळ थोडेसे खाली घेऊन तेथून गाडी चालवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण माहीम, दादर आणि लोअर परळ येथे हे काम करणे शक्य नाही, असे पश्चिम रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे ही गाडी पश्चिम रेल्वेवर चालवण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाने दिल्यास ती वांद्रे-विरार या टप्प्यातच चालवली जाईल, असेही या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

दळण आणि ‘वळण’ : गाडी चाललीच पाहिजे..