मुंबई : मुसळधार पाऊस पडल्यानंतर रेल्वे सेवा विस्कळीत होऊन मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडू नये यासाठी पालिकेने रेल्वे प्रशासनाबरोबर समन्वय साधून युद्धपातळीवर रेल्वेच्या हद्दीत नालेसफाई, मोऱ्यांची (कल्व्हर्ट) सफाई हाती घेतली आहे. त्याचबरोबर पूर्व उपनगरांमधील मध्य आणि हार्बर मार्गावर पावसाचे पाणी साचू नये म्हणून सुमारे २८ ठिकाणी साचणाऱ्या पावसाच्या पाण्याचा उपसा करणारे पंप बसविण्यात येत आहेत. रेल्वेच्या हद्दीतील विविध पावसाळापूर्व कामे पार पाडण्यासाठी यंदाही पालिकेने मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनासमवेत रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळय़ा नाल्यांमधील गाळ उपसण्यासह मोऱ्यांच्या स्वच्छतेची कामे हाती घेतली आहेत. या कामांना वेग देण्यासह विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप बसविणे, आवश्यक तेथे वृक्ष छाटणी करणे आदी कामे करण्यात येत आहेत. या सर्व कामांसंदर्भात आढावा घेण्यासाठी पालिका अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांच्या दालनात एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ही सर्व कामे ३१ मेपूर्वी पूर्ण करण्याचे व या सर्व कामांची पाहणी करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. पावसाळापूर्व कामांचा आढावा घेण्यासाठी पालिका मुख्यालयात मंगळवारी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे अधिकारी, रेल्वेचे अधिकारी व समन्वय अधिकारी उपस्थित होते. रेल्वे मार्गावर पाण्याचा उपसा करणारे पंप २८ ठिकाणी बसविण्यात येणार असून यापैकी मध्य रेल्वे व हार्बर मार्गावरीस १८ ठिकाणी, तर पश्चिम रेल्वे मार्गावरील १० ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहेत. पश्चिम रेल्वे मार्गावर प्रभादेवी ते दादर दरम्यान प्रत्येकी ३ हजार घन मीटर प्रति तास उपसा क्षमता असलेले २ पंप बसविण्यात येणार असून त्याद्वारे उपसलेले पाणी प्रमोद महाजन उद्यानातील भूमिगत साठवण टाक्यांमध्ये सोडण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त दादर ते माटुंगा रोड दरम्यान ६ ठिकाणी, तर वांद्रे टर्मिनस स्थानकालगत ३ ठिकाणी पंप बसविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे मार्गावर मस्जिद स्थानक, सॅण्डहस्र्ट, भायखळा, चिंचपोकळी, परळ, शीव (सायन), घाटकोपर, विद्याविहार, विक्रोळी, भांडुप, नाहूर आणि हार्बर मार्गावर शिवडी, वडाळा, टिळक नगर या रेल्वे स्थानकांलगत वेगवेगळय़ा क्षमतेचे पंप बसविण्यात येणार आहेत. मस्जिद स्थानकावर गतवर्षी २ हजार घन मीटर प्रति तास पाणी उपसा करणारे पंप बसविण्यात आले होते. यंदा अधिक क्षमतेचे पंप बसविण्यात येणार असून त्यामुळे ९ हजार घन मीटर प्रति तास पाण्याचा उपसा होऊ शकेल, अशी यंत्रणा उभारली जात आहे. भायखळा रेल्वे स्थानकालगतचे पाणी महालक्ष्मी स्थानकाखालून लव्हग्रोव्ह उदंचन केंद्राकडे जाते. त्यामुळे महालक्ष्मी स्थानकाखाली २४ हजार घन मीटर प्रति तास क्षमतेची पाणी उपसा यंत्रणा बसविण्यात येत आहे. चुनाभट्टी स्थानकलगत रुळाखाली रेल्वे प्रशासनाकडून कल्व्हर्ट बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. या कल्व्हर्टला पर्जन्य जलवाहिनी जोडून ११ हजार घन मीटर प्रति तास पाणी वाहून नेता येईल असे पंप जोडले जात आहेत. त्यामुळे मध्य व हार्बर रेल्वेच्या या स्थानकांवर पाणी साचणार नाही अशी अपेक्षा आहे. शीव व कुर्ला स्थानकाला दिलासा शीव स्थानक ते कुर्ला स्थानकादरम्यानच्या परिसरातील पावसाचे पाणी मिठी नदीला येऊन मिळते. त्यादृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या लाल बहादूर शास्त्री मार्गालगत नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे करताना काही ठिकाणी संयंत्रांद्वारे पोहोचणे शक्य होत नाही. या समस्येवर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने सिल्ट पुशर या आधुनिक संयंत्राचा वापर करुन गाळ काढण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे शीव ते कुर्ला स्थानक दरम्यानच्या रुळांवरील पावसाळी पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.