न्यायालयाच्या आदेशामुळे शिवसेना हतबल न्यायालयाने आदेश देताच महापालिकेने मुंबईमध्ये ठिकठिकाणी उभ्या असलेल्या शिवसेनाप्रणीत ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयानेच आदेश दिल्यामुळे शिवसेना हतबल झाली आहे. मात्र, पालिकेत सत्ता असतानाही कारवाई रोखण्याबाबत शिवसेनेकडून कोणत्याच हालचाली होत नसल्याने ‘शिव वडापाव’ गाडीचालक प्रचंड नाराज झाले आहेत. ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई होत नसल्याच्या विरोधात सामाजिक संस्थेने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने अलीकडेच ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेला दिले. त्यानंतर पालिकेच्या उपअनुज्ञापन अधीक्षकांनी परिपत्रक जारी करीत या गाडय़ांविरुद्ध अतिक्रमण निर्मूलनांतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले. कारवाईची माहिती न्यायालयाला द्यावयाची असल्यामुळे त्याबाबतचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, असेही परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. हे परिपत्रक पालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांतील संबंधित अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले असून अधिकाऱ्यांनी आपापल्या हद्दीमधील ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मात्र ‘शिव वडापाव’च्या गाडीला संरक्षण देण्याची जबाबदारी शिवसेना नेते घेत नसल्याने गाडीचालक प्रचंड नाराज झाले आहेत. आजघडीला सुमारे ३०० च्या आसपास ‘शिव वडापाव’च्या गाडय़ा मुंबईत आहेत. काही तांत्रिक अडचणींमुळे या गाडय़ा अधिकृत करणे पालिका प्रशासनाला शक्य झालेले नाही. मात्र, पालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या आशीर्वादाने या अनधिकृत गाडय़ा सुरू असून पालिका अधिकारीही त्याकडे कानाडोळा करीत होते. पालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यानंतर ‘शिव वडापाव’च्या अनधिकृत गाडय़ांबाबतचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे ‘स्वाभिमान’ संघटनेने शिवसेना आणि पालिका प्रशासनाला आव्हान देत ‘स्वाभिमान वडापाव’च्या गाडय़ा सुरू केल्या होत्या. त्यापाठोपाठ काँग्रेसने ‘कांदेपोहे’ योजनेची घोषणा करीत बेरोजगारांना गाडय़ा उभ्या करून दिल्या. त्यामुळे बराच गोंधळ उडाला होता. दरम्यान, पालिकेची निवडणूक जवळ येत असताना ‘शिव वडापाव’च्या गाडय़ांवर कारवाई सुरू झाल्यामुळे शिवसेना नेत्यांच्याही पोटात गोळा उठला आहे. बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी काही वर्षांपूर्वी शिवसेनेने ‘शिव वडापाव’ योजना सुरू केली. या योजनेसाठी शिव सहकार सेवा सहकारी संस्थेची स्थापना करण्यात आली. ही गाडी मिळविण्यासाठी दादर येथील शिवसेना भवनामध्ये संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे अर्ज सादर केल्यानंतर किमान एक ते कमाल सहा महिन्यांत अर्जदाराला ‘शिव वडापाव’ची गाडी देण्यात येत होती. या गाडय़ा दोन प्रकारच्या होत्या. आकाराने लहान असलेल्या गाडीसाठी ५५ हजार रुपये, तर थोडय़ा मोठय़ा गाडीसाठी ६० हजार रुपये अनामत रक्कम घेण्यात येत आहे. गाडीसाठी स्थानिक शाखाप्रमुखाची शिफारस बंधनकारक आहे. या सर्व गाडय़ांवर एकाच चवीचा वडा मिळावा यासाठी खास मसाला तयार करण्यात आला असून, तो शिवसेना भवनात उपलब्ध करण्यात आला आहे.