मुंबई : अदानी एअरपोर्ट सिटी लिमिटेड मुंबई आणि नवी मुंबईसह पाच राज्यांमधील सहा विमानतळांवर एकात्मिक विमानतळ शहरे विकसित करणार आहे. त्याचाच भाग म्हणून पहिल्या टप्प्यात २० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केली जाणार आहे. यात ६५५ एकर परिसरात पसरलेल्या या प्रकल्पांमध्ये हॉटेल्स, कार्यालये, दुकाने, मनोरंजन आणि संमेलन स्थळांचा समावेश असून यापैकी जवळपास ७० टक्के गुंतवणूक मुंबई क्षेत्रावर केंद्रित असणार आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील ४४० एकर जागेचा समावेश आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेड आपली पूर्ण मालकीची उपकंपनी एएसीएलमार्फत, मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद, लखनौ, जयपूर आणि गुवाहाटी येथे सुमारे २२ दशलक्ष चौरस फूट क्षेत्र विकसित करणार आहे. प्रकल्प एकात्मिक, पायी फिरण्यायोग्य शहरी जिल्हे म्हणून डिझाइन केले आहेत. त्यामुळे प्रवासी, व्यावसायिक आणि स्थानिक समुदाय विमानतळ, मेट्रो आणि शहर वाहतूक पायाभूत सुविधांसह हॉटेल्स, कार्यालये, किरकोळ विक्री, भोजन, मनोरंजनाचा लाभ घेऊ शकतात. हा प्रकल्प सिंगापूरचे चांगी, दुबई आंतरराष्ट्रीय, ॲमस्टरडॅमचे शिफोल आणि सोलचे इंचिऑन यांसारख्या जागतिक स्तरावर यशस्वी ठरलेल्या विमानतळ जिल्ह्यांपासून प्रेरित आहे. जगभरात, सर्वात यशस्वी विमानतळ जिल्हे हे व्यापार, पर्यटन आणि शहरी विकासाची केंद्रे झाली आहेत. भारताची विमान वाहतूक बाजारपेठ विस्तारत असताना, विमानतळांना विमान वाहतुकीच्या पलीकडे जाऊन मूल्य निर्माण करण्याची संधी आहे.

आम्ही एकात्मिक शहरी स्थळांचे जाळे तयार करत असून तेथे विमानतळ हे गुंतवणूक, रोजगार, प्रवाशांचा उत्तम अनुभव आणि ते सेवा देत असलेल्या शहरांच्या दीर्घकालीन विकासासाठी उत्प्रेरक होतील, असे एएएचएलचे संचालक जीत अदानी यांनी सांगितले. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, एएएचएलने आयएचजी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्ससोबत पाच लक्झरी आणि प्रीमियम हॉटेल्ससाठी हॉटेल व्यवस्थापन करारांवर स्वाक्षरी केली आहे. यात भारतातील किम्प्टन ब्रँडच्या पदार्पणाचाही समावेश आहे. ही कंपनी आदरातिथ्य, खाद्य आणि पेय, दुकाने आणि मनोरंजन या क्षेत्रांतील आघाडीच्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय भागीदारांसोबतही काम करत आहे.