दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर अखेर खार पोलिसांकडून राणा दांपत्याला अटक करण्यात आली आहे. मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आलेल्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना दिवसाअखेर मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी सकाळी ९ वाजता राणा दाम्पत्य मातोश्री येथे जाऊन हनुमान चालीसा पठण करणार होतं. मात्र, दिवसाअखेर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. यानंतर आता राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्री यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीमध्ये शिवसेना नेते संजय राऊत, मंत्री अनिल परब यांच्यासह शिवसैनिकांचेही नाव आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबई पोलिसांकडे लेखी तक्रार केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत यांच्यासह सर्व ७०० जणांवर कलम १२०बी, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे हनुमान चालीसा म्हणण्याचं आव्हान नवनीत राणा आणि रवि राणा यांनी दिलं होतं. काही दिवसांपूर्वी २३ एप्रिल रोजी आपण मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं म्हटलं होतं. शुक्रवारी सकाळी राणा दाम्पत्य नागपूरहून मुंबईत दाखल झालं. त्यानंतर दिवसभर शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर तळ ठोकला होता. रात्रभर शिवसैनिक मातोश्रीबाहेर होते. त्यानंतर शनिवारी सकाळपासून शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात राणा यांच्या घराबाहेर गर्दी केली होती. त्यानंतरही राणा दाम्पत्याने व्हिडीओद्वारे आपण हनुमान चालिसा पठण करण्यासाठी जाणार असल्याची भूमिका घेतलेली होती. मात्र नंतर त्यांनी भूमिकेवरून माघार घेतली.

त्यानंतर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानातून ताब्यात घेतलं. पोलीस दोघांना खार पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यानंतर पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पार पाडत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.