देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतील हवेची गुणवत्ता आज रात्रीपासून खराब होऊ शकते. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणाऱ्या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) संस्थेने हा अंदाज वर्तवला आहे. सफरनुसार, अतिसूक्ष्म कणांची पातळी दिवाळीमध्ये चार नोव्हेंबरच्या रात्री आणि पाच नोव्हेंबरच्या सकाळी २.५ ते १० पीएमपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सहा नोव्हेंबरपासून हवेच्या गुणवत्तेत सुधारणा होण्याचा अंदाज असला तरी वांद्रे कुर्ला संकुल आणि चेंबूर परिसरात हवेचा स्तर सर्वात वाईट राहणार आहे.

दिवाळी सुरू होण्यापूर्वीच मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळू लागली आहे. काही भागात, हवेची पातळी खराब आणि अत्यंत खराब पातळीवर पोहोचली आहे. माझगाव, बीकेसी, कुलाबा आणि मालाड येथील हवेची गुणवत्ता खराब असल्याचे आढळून आले, तर इतर भागातील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी दिवाळीच्या काळात मुंबईतील हवेची गुणवत्ता अत्यंत खराब या श्रेणीत असते. गेल्या वर्षी करोनाच्या निर्बंधांमुळे हवेची गुणवत्ता चांगली होती, पण यावेळी सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत, त्यामुळे दिवाळीच्या काळात हवेची गुणवत्ता खराब ते अत्यंत खराब अशा श्रेणीत असणार आहे.

हवेच्या गुणवत्तेचे परीक्षण करणार्‍या सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च (सफर) नुसार, मंगळवारी मुंबईची सरासरी हवेची गुणवत्ता २६६ हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) इतका नोंदवण्यात आला आहे, जी खराब श्रेणीमध्ये येतो. त्याचप्रमाणे, चार विभागांमधील हवेची गुणवत्ता खराब आणि अत्यंत खराब श्रेणीत आहे. माझगावमध्ये ३५६ एक्यूआय, बीकेसी मध्ये ३१३ एक्यूआय, कुलाबा ३४६ एक्यूआय आणि मालाडमध्ये २२४ एक्यूआयची नोंद करण्यात आली आहे.

फक्त भांडुप आणि वरळी येथी हवा हवेच्या गुणवत्तेमध्ये सामान्य श्रेणीमध्ये असल्याचेआढळून आले. सफारचे शास्त्रज्ञ गुफ्रान बेग म्हणाले की, प्रदूषणाची पातळी किती जास्त किंवा किती कमी असेल हे आर्द्रता आणि वाऱ्याच्या वेगावर अवलंबून असते.

दरम्यान, दिवाळीनंतर दिल्लीसारख्या शहरात तर परिस्थिती अधिकच बिकट होते. यावर्षीही दिल्लीत पुन्हा वायू प्रदूषणाचा धोका झपाट्याने वाढत आहे. काही दिवसांत दिल्लीच्या हवेत श्वास घेणे घातक ठरू शकते. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टमनुसार दिल्लीतील लोकांना येत्या काही दिवसांत प्रदुषणाच्या समस्येचा सामना करावा लागणार आहे.

२०१९ च्या तुलनेत यंदाच्या दिवाळीत लोकांनी निम्म्या प्रमाणात जरी फटाके फोडले, तर दिल्लीत श्वास घेणे कठीण होणार आहे. प्रदूषण आणि हवामानाची स्थिती सांगणाऱ्या सफर या संस्थेने दिवाळीसंदर्भात हा अंदाज वर्तवला आहे.