भारती एअरटेल आणि लूप मोबाईल यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार, आता लूप मोबाईलच्या मुंबईतील सेवा क्षेत्रावर भारती एअरटेलची मालकी प्रस्थापित झाली आहे. या व्यवहाराची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आल्यानंतर, आता याबाबतच्या अंतिम करारावर स्वाक्षरी करण्यात आली. त्यामुळे भारती एअरटेल मुंबईतील सर्वाधिक मोबाईल ग्राहकसंख्येचे संख्येचे नेटवर्क बनले आहे. सध्याच्या घडीला भारती एअरटेलच्या मुंबईतील ग्राहकांची संख्या ४ कोटी असून, आता त्यामध्ये लूप मोबाईलच्या ३ कोटी ग्राहकांची भर पडणार आहे. तसेच लूप मोबाईलच्या मालकीची २५००पेक्षा अधिक टु-जी सेल साईटस् एअरटेलच्या ताब्यात येतील. या करारांतर्गत लूप मोबाईलचा मुंबईतील उद्योग आणि मालमत्ता एअरटेलच्या मालकीची होणार आहे. भारती एअरटेल आणि लूप मोबाईलमधील हा करार तब्बल ७०० कोटींचा असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत असला, तरी याचा अधिक तपशील अजूनपर्यंत जाहीर करण्यात आलेला नाही. मात्र, हा करार अंमलात येण्यासाठी दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या काही परवानग्या मिळणे आवश्यक आहे.