जयदेव ठाकरेंचा गौप्यस्फोट; प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या इच्छापत्रावरून जयदेव आणि उद्धव यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर वादाला नवे वळण मिळाले आहे. आपली दुसरी पत्नी स्मिता ठाकरे हिचा मुलगा ऐश्वर्य ठाकरे हा आपला मुलगाच नाही, असा गौप्यस्फोट जयदेव यांनी बुधवारी उच्च न्यायालयातील उलटतपासणीदरम्यान करत खळबळ उडवून दिली. जयदेव यांच्या या गौप्यस्फोटानंतर प्रकरणाची सुनावणी ‘इन-कॅमेरा’ करण्यात आली. उद्धवने बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडपल्याचा दावा करत जयदेव यांनी इच्छापत्राच्या वैधतेला आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू असून सोमवारपासून उद्धव यांच्या वकिलांकडून जयदेव यांची उलटतपासणी घेण्यात येत आहे. ‘मातोश्री’ सोडून कालिना येथील घरी राहायला गेल्यानंतरही जयदेव यांचे ‘मातोश्री’वर बाळासाहेबांना भेटण्यासाठी येणे-जाणे सुरू होते. त्याच्याशी आणि ‘मातोश्री’पासून दूर राहण्याच्या कालावाधीबाबत उद्धव यांचे वकील रोहित कपाडिया यांनी बुधवारच्या सुनावणीत जयदेव यांची प्रामुख्याने उलटतपासणी केली. त्या वेळेस जयदेव यांनी हा गौप्यस्फोट केला. २००४ नंतर जेव्हा जेव्हा रात्री ‘मातोश्री’वर राहिलो. त्या वेळेस दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपायचो. पहिल्या मजल्यावर ‘कुणी तरी अनोळखी व्यक्ती’ राहत होती. या ‘अनोळखी व्यक्ती’बाबत उद्धव यांच्या वकिलांनी जयदेव यांच्याकडे विचारणा केली असता सुरुवातील त्यांनी गप्प राहणे पसंत केले. मात्र नंतर उत्तर देताना पहिल्या मजल्यावरील खोली नेहमी बंद असायची. परंतु जेव्हा केव्हा ती खुली असे तेव्हा तेथे ‘कुणी तरी अनोळखी’ व्यक्ती राहत असे. ती व्यक्ती कोण होती हे मला माहीत नाही. त्यामुळे बाळासाहेबांनाच या व्यक्तीबाबत विचारले. त्यावेळेस ‘ऐश्वर्य’ नावाची व्यक्ती तेथे राहत असल्याचे त्यांनी मला सांगितले, असा दावा जयदेव यांनी केला. त्यावर ऐश्वर्य हा तुमचा मुलगा आहे का, असा थेट प्रश्न उद्धवच्या वकिलांनी करताच ‘नाही, तो माझा मुलगा नाही’. उलट मी त्याच्या वस्तुस्थितीबाबत सांगणारच होतो. पण संधी मिळाली नाही, असे जयदेव यांनी सांगितले. जयदेव यांच्या या उत्तरानंतर न्यायालयाने दुसऱ्या सत्रात त्यांची उलटतपासणी सुरू राहील, असे जाहीर केले. स्मिता ठाकरेंबाबत खुलासा स्मिताचे राजकारणातील स्वारस्य आणि तिच्या ‘मातोश्री’वर येणाऱ्या राजकारण्यांशी भेटीगाठी आपल्याला पसंत नव्हत्या. त्यामुळेट आमच्यात सतत वाद होत होते आणि या भांडणामुळेच बाळासाहेबांनी मध्यस्थी करून १९९९ मध्ये आपल्याला कालिना येथील घरी राहण्याचा सल्ला दिला होता. आमच्या दोघांमधील वाद संपेपर्यंत वा त्यावर काही तोडगा निघेपर्यंत दिवसा घरी ये आणि रात्रीच्या वेळेस आधी कालिना येथील घरी जा, असे बाळासाहेबांनीच मला सांगितले होते. त्यामुळे मी घर सोडल्यानंतरही स्मिता मात्र ‘मातोश्री’वरच राहत होती. घटस्फोट देईपर्यंत ती तेथे राहत होती. या काळात आपण दररोज दिवसा ‘मातोश्री’वर जायचो, असे जयदेव यांनी न्यायालयाला सांगितले.