पवारांच्या नातलगांच्या घरी सुरू असलेल्या ईडीच्या धाडीवरून लक्ष विचलीत करण्यासाठी अजित पवारांनी नवाब मलिकांना पुढे आणलंय, असा आरोप किरीट सोमय्यांनी केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून पवारांच्या नातेवाईकांच्या घरी ईडीची छापेमारी सुरू आहे, त्याचा संबंध उपमुख्यमंत्री अजित पवारांशी आहे. त्यामुळे जरंडेश्वर साखर कारखान्यात झालेला घोटाळा आणि सुरू असलेल्या कारवाईवरून सर्वांचं लक्ष विचलीत व्हावं, यासाठी नवाब मलिकांना पुढे आणलंय आणि ते समीर वानखेडेंवर आरोप करत आहेत. दरम्यान, पवार कुटुंबीयाचे जावई मोहन पाटील यांच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून, असा सवाल किरीट सोमय्यांनी केला आहे.

गेल्या १९ दिवसांपासून आयकर विभाग आणि ईडीची कारवाई पवारांच्या कुटुंबीयांवर सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून नवाब मलिक रोज माध्यमांसमोर येऊन समीर वानखेडे यांच्यासह कुटुंबीयांवर आरोप करत आहेत. जेव्हा नवाब मलिक यांच्या कुटुंबीतील मुलीचं समीर वानखेडेशी लग्न झालं होतं, तेव्हापासून आतापर्यंत नवाब मलिक गप्प का बसले होते. आतापर्यंत नवाब मलिक यांनी याप्रकरणी कोणतंही भाष्य का केलं नव्हतं, असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.

दरम्यान, १०५० कोटी रुपयांची बेनामी संपत्ती कुठून आली, यासंदर्भात उद्धव ठाकरे आणि अजित पवारांनी समोर येऊन यासंदर्भात उत्तर द्यावं. पवार परिवाराने महाराष्ट्राला लुटलंय, असा आरोप सोमय्या यांनी केला. तसेच, नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांवर ड्रग्ज प्रकरणात केलेले सर्व आरोप खोटे असल्याचं किरीट सोमय्या म्हणाले.