मुंबई : म्हाडाच्या पुणे मंडळातील ५२११ घरांसाठी गुरुवारी सोडत काढण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे सोडत काढण्यात आली. ५२११ घरांसाठी सुमारे ७१ हजार ७४२ अर्ज सादर झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या सोडतीतील पहिले विजेते सागर खैरनार ठरले आहेत. पुणे मंडळाने जुलैमध्ये ५२११ घरांसाठी सोडत जाहीर केली होती. त्यानुसार अर्ज विक्री, स्वीकृती आणि सोडतपूर्व प्रक्रिया पूर्ण करून गुरुवारी सोडत काढण्यात आली. मुळात ही सोडत २९ जुलै रोजी काढण्यात येणार होती. मात्र म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्न मर्यादेत राज्य सरकारकडून बदल करण्यात आला. त्यामुळे नवीन उत्पन्न मर्यादेसह अर्ज भरून घेणे आवश्यक बनल्याने संगणकीय प्रणालीत तसे बदल करून पुणे मंडळाने जुलैमध्ये अर्जस्वीकृती सुरू केली. या पार्श्वभूमीवर सोडतपूर्व प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे सोडत २९ जुलैऐवजी १८ ऑगस्ट रोजी निश्चित करण्यात आली होती. गुरुवारी काढण्यात आलेल्या या सोडतीत पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील ५२११ घरांचा समावेश आहे. यापैकी २० टक्के योजनेतील २०८८, म्हाडा पंतप्रधान आवास योजनेतील १७०, म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्राधान्य गटातील २६७५ आणि म्हाडाच्या विविध योजनेतील २७९ घरांचा समावेश आहे. या सोडतीद्वारे ५२११ अर्जदार विजेते ठरले असून आता पुढे त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करून त्यांना घरांचा ताबा देण्यात येणार आहे. प्रतीक्षायादीचा समावेश म्हाडा सोडतीतील घर वाटपात प्रतीक्षायादीच्या प्रक्रियेअंतर्गत भ्रष्टाचार होत असल्याचा आक्षेप घेत काही महिन्यांपूर्वी तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रतीक्षायादी कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी औरंगाबादच्या घरांच्या सोडतीपासून करण्यात आली आहे. असे असले तरी पुणे मंडळाची आजची सोडत प्रतीक्षायादीसह काढण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांसाठी हा दिलासा मानला जात आहे. पोलिसांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याची ग्वाही सर्वसामान्यांना परवडणारी घरे देण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असेल असे या वेळी मुख्यमंत्री म्हणाले. म्हाडाच्या ५२११ घरांसाठी ७२ अर्ज सादर होणे यावरून म्हाडाची विश्वासाहर्ता दिसून येते. राज्यात अधिकाधिक परवडणारी घरे देण्यासाठी म्हाडा आणि सिडकोच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील. पोलिसांच्या घरांचे स्वप्न पूर्ण करण्याचाही प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.