मुंबई : भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईत सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सरकारी आस्थापना, संवेदशील ठिकाणे व धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती व रेल्वे स्थानकांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकामार्फत तपासणी करण्यात आली. दरम्यान, परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालय बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई-मेल प्राप्त झाला होता. पण तपासणीत काहीच संशयास्पद सापडले नाही.

ऑपरेशन सिंदूरनंतर सर्व पोलीस व सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर घातपात विरोधी तपासणी करण्यात आली. त्यात चर्चगेट, सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला, मुंबई सेंट्रल, अंधेरी, चेंबूर, गोवंडी, बोरिवली या रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी रुटमार्च केला. यावेळी रेल्वे स्थानकांवरील पूल, फलाट, अडगळीची ठिकाणे, संशयीत व्यक्ती व बॅगांची तपासणी करण्यात आली. विशेष करून लांबपल्ल्यांच्या वाहनांची सुरक्षा तपासणी करण्यात आली.

यावेळी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. स्थानक परिसरात असताना काही संशयित आढळल्यास त्याची माहिती तात्काळ पोलिसांना द्यावी. देशात सुरू असलेल्या घडामोडीच्या अनुषंगाने काही समाजकंटकामार्फत अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस मित्र म्हणून पोलीस प्रशासनाला मदत करावी. परिसरात कायदा व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होणाऱ्या लहान- मोठ्या गोष्टीबाबतची माहिती पोलीस प्रशासनाला द्यावी. समाज माध्यमांवरील आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होत असून त्यावर आपण कोणीही विश्वास ठेवू नये. तसेच असे मजकूर प्रसारित होत असतील तर त्याबाबत पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी.

संशयित इसमाच्या हालचालींवर लक्ष ठेऊन त्याची माहिती पोलिसांना द्यावी, बेवारस बॅग, संशयास्पद वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, तसेच संशयास्पद व्यक्ती अगर हालचाली दिसल्यास त्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या.
याशिवाय मुंबईतील सरकारी आस्थापना, धार्मिक स्थळे, परदेशी वकिलाती यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. बंदोबस्ताला तैनात शस्त्रधारी पोलिसांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. याशिवाय मुंबईतील किनारपट्टी परिसरातील सुरक्षेच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. त्याअंतर्गत मुंबई पोलिसांनी भारतीय तटरक्षक दलाच्या समन्वयाने समुद्रकिनारे, बंदरे, गोदी, आणि समुद्रमार्ग यासह सर्व किनारपट्टी भागांमध्ये गस्त वाढवली आहे. संवेदनशील भागांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून सर्वत्र लक्ष ठेवण्यात येत आहे. तसेच गस्तीतही वाढ करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी ‘सागरी कवच’ ही व्यापक तटरक्षक मोहीम हाती घेतली आहे.

मच्छीमारांना सतर्क राहण्याच्या सूचना

या उपक्रमाअंतर्गत सागरी गस्त वाढवण्यात आली आहे. तसेच, मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणतीही अनधिकृत व्यक्ती समुद्रमार्गे प्रवेश करू नये, यासाठी मच्छीमार बोटींच्या सर्व प्रवेश आणि जाण्याच्या मार्गांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विशेष करून मुंबईवर २६/११ चा हल्ला करणारे दहशतवादी समुद्र मार्गानेच आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास त्वरित पोलीस किंवा जवळच्या सुरक्षा यंत्रणेला कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

टाटा रुग्णालयाला धमकीचा ईमेल

परळ येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात बॉम्ब असल्याची धमकीचा ई-मेल शुक्रवारी सकाळी प्राप्त झाला. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ सर्व ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली. त्यावेळी कोणतीही संशयास्पद वस्तू सापडली नाही, असे पोलिसांनी सांगितले. रुग्णालयाला सकाळी आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. त्यानंतर संपूर्ण रुग्णालयाची बॉम्ब शोधक पथकाकडून तपासणी करण्यात आली.