मुंबई : ‘‘भाजप आणि जनतेला दगा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला आगामी निवडणुकांमध्ये भुईसपाट करा. धोका देणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे’’, अशी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल़े  एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी युती करून भाजप आगामी निवडणुका लढवणार असून, मुंबईसह महाराष्ट्रात भाजपचे वर्चस्व आणि सत्ता राहील, यादृष्टीने तयारी करण्याचे आदेश शहा यांनी दिल़े

दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आलेल्या शहा यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी भाजपच्या मुंबईतील खासदार-आमदार, पदाधिकारी, माजी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सर्वानी सज्ज राहून, भाजप-शिंदे गटाच्या विजयासाठी आणि भाजपच्या वर्चस्वासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले.

‘‘राजकारणात सारे काही सोसले, तरी दगाबाजी सहन करू नका. जे दगा देतात, त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतील राजकारणात भाजपचे वर्चस्व दाखविण्याची आणि उद्धव ठाकरे यांना त्यांची जागा दाखविण्याची वेळ आली आहे’’, असे शहा म्हणाले.

शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी २०१९ च्या निवडणुकांआधी झालेल्या चर्चेचे तपशील या नेत्यांपुढे विशद केले. ठाकरे यांनी २०१४ मध्ये केवळ दोन जागांसाठी विधानसभेत युती तोडली होती, असे सांगून शहा म्हणाले, लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकीआधी ठाकरे आणि फडणवीस यांच्यात चर्चा सुरू होत्या. तेव्हा शिवसेनेने मुख्यमंत्रीपद मागितले. फडणवीस यांनी मध्यरात्री ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ बंगल्यावर असताना हे दूरध्वनीवर मला सांगितल्यानंतर तसे असल्यास युती करायची नाही, ही भूमिका मी घेतली होती़ त्यावेळी फडणवीस तेथून बाहेर पडले. त्यानंतरच्या चर्चेत आणि जाहीर सभांमध्ये भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असे मी सांगितले होते. युतीच्या घोषणेच्या पत्रकार परिषदेआधीही ठाकरे यांना याची पूर्ण कल्पना दिली होती. भाजप अधिक जागा लढविणार असून भाजपला ५१ टक्के तर शिवसेनेला विधानसभेत ४९ टक्के जागा मिळतील. ज्या जागा कायम हरल्या आहेत, त्यातील काही जागाही भाजपला मिळाव्यात. ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदाचा आग्रह कायम असेल किंवा ते तसे बोलले, तर मी पत्रकार परिषदेतून बाहेर पडेन, इतके आम्ही ठरविले होते’’, असे शहा यांनी सांगितल़े

ठाकरे यांच्याबरोबर ‘मातोश्री’ निवासस्थानी केवळ अडीच मिनिटे राजकीय मुद्दय़ांवर चर्चा झाली आणि अन्य गप्पा झाल्या. ठाकरे आणि माझ्यात बंद खोलीआड चर्चाही झाली नाही आणि मी कोणेतही आश्वासन दिलेले नाही. तरीही ठाकरे यांनी मी मुख्यमंत्रीपद देण्याचे कबूल केल्याचा दावा केला. वास्तविक २०१९ मध्ये युतीचे बहुमताचे सरकार आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर युतीने निवडणुकीत मते मागितली होती. पण शिवसेनेने भाजप व जनतेचाही विश्वासघात केला. उद्धव ठाकरे यांनीच आमच्या जागा पाडून आमच्या पाठीत खंजीर खुपसला, असे शहा म्हणाल़े  महाराष्ट्रातील हिंदू विरोधी राजकारण संपवायचे आहे, असे शहा यांनी स्पष्ट केले.

मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे: आशिष शेलार गेल्या निवडणुकीत जे निसटले, ते यंदा गमवायचे नाही, असे सांगून मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यावेळी म्हणाले, मागील निवडणुकीत १३ प्रभागांमध्ये ५० ते १०० मतांनी आपला पराभव झाला. आता १५० जागांवर विजय मिळवायचा आहे. मुंबई एका भ्रष्टाचारी परिवारात अडकली असून, आता मुंबईकरांसाठीच आपल्याला मैदानात उतरायचे आहे. गेल्या निवडणुकीत अधुरे राहिलेले स्वप्न २०२२ ला पूर्ण करायचे आहे.

लालबागच्या राजाचे दर्शन

अमित शहा यांनी सोमवारी सकाळी लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन घेतले. त्याचबरोबर शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन व मुंबई भाजप अध्यक्ष अँड. आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील सार्वजनिक गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी शहा यांच्यासमवेत भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार पूनम महाजन, मनोज कोटक, गोपाळ शेट्टी आदी उपस्थित होते.

ही शेवटची निवडणूक समजून लढा : फडणवीस

आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्या जीवनातील शेवटची निवडणूक आहे, असे समजून लढण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदाधिकारी, नेत्यांना केले. आता केवळ मुंबई महापालिका हे एकच लक्ष्य आहे. मुंबईतील मूळ शिवसेना भाजपबरोबर आली आहे. अमित शहा हे आजच्या काळातील ‘चाणक्य ’ असून, हे देशाला माहीत आहे, असे फडणवीस म्हणाल़े