मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या यूपीए आहेच कुठे या विधानामुळे कॉंग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याच्या चर्चेला पूर्णविराम देत सध्या वेगळी आघाडी तयार करणे म्हणजे भाजपाला मदत करण्यासारखे आहे. देशात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी करायची असेल तर काँग्रेस वगळून ती होऊ शकत नाही, अशी भूमिका मांडत राष्ट्रीय राजकारणात कॉंग्रेसबरोबर असल्याची भूमिका शिवसेनेने मांडली आहे. त्याचबरोबर यूपीएचे काय करायचे हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी एकदा सांगावे, असेही शिवसेनेने म्हटले आहे. आज देशात यूपीए किंवा एनडीए दोन्ही नाहीत. १० वर्षे यूपीए सत्तेत होती. आज शिवसेना, अकाली दल एनडीएतून बाहेर पडले. अशावेळी २०२४ साठी यूपीए अधिक मजबूतपणे सर्व पक्षांना घेऊन उभी राहिली पाहिजे, असे शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे म्हणणे आहे. यूपीएत अनेक पक्ष यायला तयार नाही असं दिसतं. यात ममता, अखिलेश यादव हे सध्या बाहेर आहेत. त्यांचे मन वळवायला पाहिजे, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. आता वेगळी आघाडी झाल्यास भाजपालाच मदत केल्यासारखे होईल. कारण त्यात काँग्रेस किंवा काँग्रेसला मानणारे डीएमके, राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष त्या आघाडीत नसतील तर याचा उपयोग होणार नाही. यात डावेही असू शकतात, ते या आघाडीत येतील का, तर नाही. शरद पवार यांनी फार समंजस आणि संयमी भूमिका घेतली आहे.