मुंबई आणि आसपासच्या शहरांना अन्नधान्य आणि भाजीपाला पुरवठा करणाऱ्या नवी मुंबई एपीएमसीमधल्या कांदा बटाटा मार्केटचा कारभार आज ठप्प आहे. माथाडी कामगारांनी आज बंद पुकारल्यामुळे या मार्केटचं काम सध्या बंद आहे. ५० किलोपेक्षा जास्त वजनाची पोती उचलणार नाही, असा पवित्रा माथाडी कामगारांनी घेतल्याने या मार्केटमधलं काम सध्या बंद पडलं आहे.

आज सकाळपासून माथाडी कामगारांनी बंद पाळला आहे. या मार्केटमध्ये दररोज कांदा बटाट्याच्या जवळजवळ १०० ते १२० गाड्यांची आवक होत असते. यामध्ये ५० किलोहून अधिक वजनाच्या अनेक गोण्या असतात. राज्य सरकारचाही आदेश आहे की, ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोण्या भरु नका. जर ५० किलोपेक्षा जास्त वजन असेल तर माथाडी कामगारांना त्या गोण्या गाडीतून उतरवून गाळ्यामध्ये नेताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं.

हे ओझं उचलल्याने त्यांना मानेच्या, पाठीच्या, मणक्यांच्या अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे माथाडी कामगार युनियनकडून गोण्यांचं वजन ५० किलोपेक्षा कमी ठेवण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र याकडे एपीएमसी प्रशासन किंवा व्यापारी वर्गाकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अखेर माथाडी कामगारांनी बंद पुकारला आहे. जर या मागणीकडे लक्ष देण्यात आलं तर कांदा बटाटा मार्केटप्रमाणे इतर मार्केटही बंद करु आणि आंदोलन तीव्र करु, अशी भूमिका माथाडी कामगारांनी घेतल्याचं दिसून येत आहे.

मागील दीड वर्षांपासून या वजनासंदर्भात माथाडी कामगार व्यापारी संघटनांशी याबाबत चर्चा करत आहेत. बाजार समितीनेही याबाबत परित्रक काढले होते. मात्र याबाबत ठोस अंमलबजावणी झाली नसल्याने आज माथाडी कामगारांनी ५० किलो पेक्षा जास्त वजनाच्या गोणी उचलण्यास नकार दिला. याबाबत आज बाजार समिती प्रशासन आणि व्यापारी यांच्याशी संध्याकाळी होणार असलेल्या बैठकीत तोडगा न निघाल्यास उद्यापासून माथाडी कामगार काम बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी दिली आहे.