‘थर्ड डिग्री’ऐवजी मानसिक खच्चीकरण, तांत्रिक तपासावर पोलिसांचा भर मानवाधिकार आयोग, न्यायालयांसह माध्यमांकडून वाढता दबाव, गुन्ह्य़ांचे बदललेले प्रकार अशा विविध कारणांमुळे मुंबईत ‘थर्ड डिग्री’चे विविध प्रकार हळूहळू मागे पडू लागले आहेत. ‘कलकत्ता घोडी’, सूर्यफूल तेलाचा वापर हे त्यातले प्रचलित प्रकार. मात्र आता मानसिक छळ करून आरोपींना बोलते करण्याचा प्रयत्न असतो. या जोडीला सीसीटीव्ही कॅमेरा, मोबाइल कॉल रेकॉर्ड अशा अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मुंबईतील पोलिसांचा भार आणि आरोपींना बसणारा मार बऱ्याच अंशी कमी झाला आहे. सांगली शहर पोलीस ठाण्यात अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलिसांच्या शारीरिक छळात मृत्यू झाला आणि पोलिसांची थर्ड डिग्री पुन्हा चर्चेत आली. मुंबईतही पूर्वी पाकिटमारांपासून अतिरेक्यांपर्यंत कसलेल्या गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी पोलीस ‘थर्ड डिग्री’चा सर्रास वापर करत. त्या काळी मुंबईच्या गल्लीबोळात संघटित गुन्हेगारीचा अंश होता. दिवसाकाठी हत्या होत. खंडणीसाठी अपहरण, धमक्या अशा गुन्ह्य़ांचे प्रमाण खूपच वाढले होते. हे आरोपी कसलेले असत. आपल्या टोळीवर, म्होरक्यावर प्रचंड भक्ती. त्यांच्याकडून सहजासहजी माहिती मिळत नसे. अशावेळी थर्ड डिग्रीचा वापर करण्याशिवाय पर्यायच नव्हता. शरीरावर एकही ओरखडा न येता छळ करणे हे कसब होते. एकाला थर्ड डिग्री दिली की त्याची दहशत संपूर्ण टोळीवर बसे. मात्र वाढते आरोप, टीका, दबावासह अंग काढून घेणारे वरिष्ठ अधिकारी यामुळे हे तंत्र हळूहळू मागे पडले. मुंबईत थर्ड डिग्रीचा क्वचित वापर होतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. कुटुंबाला पोलीस ठाण्यात बोलावून विनाकारण चौकशी करण्यासह असे अनेक प्रकार केले जातात. पूर्वी सत्यशोधक पट्टय़ाचे असंख्य प्रहार सोसून तोंड न उघडणारे आरोपी होते. आता पट्टा पाहिल्यावरच बहुसंख्य आरोपी बोलतात. काही दोन-चार फटके सोसल्यावर बोलतात, असे हा अधिकारी सांगतो. वन एटी, कलकत्ता घोडी ‘थर्ड डिग्री’त शिकारीनंतर पडलेल्या जनावराचे पाय काठीला बांधून नेतात तसे आरोपीला बांधले जाते. हा कलकत्ता घोडी प्रकार. त्यासाठीची व्यवस्था पूर्वी बहुतांश पोलीस ठाण्यांमध्ये होती. चार ते पाच तास सलग बांधून पडल्यानंतर आरोपी स्वत:च्या पायावर उभा राहणे निव्वळ अशक्य. तेवढय़ावर नाही बोलला तर खाली उतरवून त्याची ‘मालीश’ होई. जसा होता तसा करून पुन्हा कलकत्ता घोडी सुरू. यामुळे भलेभले पहिल्याच टप्प्यात फुटत. बकाबका माहिती ओकत. कसलेल्या गुन्हेगारांकडून माहिती काढण्यासाठी कलकत्ता घोडी हे आमचे हुकमी हत्यार असल्याचे गुन्हे शाखेतूून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला सांगितले. जमिनीवर बसवून आरोपीचे पाय हळूहळू १८० अंशात फाकवायचे. तेवढय़ावरच काम भागे. कारण ती कळ खूप वेळ सोसणे कठीण होते. त्याने नाही भागले तर त्या अवस्थेत आरोपीच्या दोन्ही मांडय़ांवर लाकडी फळी ठेवून त्यावर दोन जण उभे राहू, याला पोलीस ‘वन एटी’ संबोधले जाते, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. सूर्यफूल तेलाच्या दोन थेंबांनी भल्याभल्यांना बोलते केल्याची आठवण अन्य एका अधिकाऱ्याने सांगितली. अंगाची लाहीलाही करणारे दोन थेंब कापसाच्या बोळ्यावर घेऊन ‘नेमक्या’ जागी चोळले की अवघ्या काही मिनिटांत परिणाम दिसे. हा प्रयोग मुंबई गुन्हे शाखेत आजही सुरू आहे. मात्र तो गंभीर गुन्हय़ांमध्ये पकडलेल्या व दिशाभूल करणाऱ्या आरोपींपुरताच मर्यादित आहे. ओणवे झोपवून दोन्ही पायांच्या टाचांवर सत्यशोधक पट्टय़ाचे किंवा काठीचे जोरदार फटके मारले जायचे. यानंतर आरोपीला चालताही येत नसे. या प्रकाराला नालबंदी असा शब्दप्रयोग होता. कानांच्या पाळीला विजेचे धक्के दिले जात. त्यासाठी खास उपकरण पोलीस बाजारातून विकत घेत. या ‘शॉक ट्रीटमेन्ट’चे टप्पे आहेत. कानाच्या पाळीपासून सुरुवात करून हळूहळू शरीराच्या खालच्या भागापर्यंत विजेचा धक्का दिला जाई. दिवसभर गोड पदार्थ खाऊ घालून झोपू न देणे, हात वर करून तासन्तास उभे ठेवणे, हेही थर्ड डिग्रीचेच प्रकार.